हातांच्या थरथरत्या स्पर्शाने चित्रप्रदर्शन संपते.....

By Admin | Updated: January 30, 2016 02:26 IST2016-01-30T02:26:49+5:302016-01-30T02:26:49+5:30

चित्र जास्त बोलकी असतात शब्दांपेक्षा. त्यामुळे सबंध सेवाग्राम आश्रम फिरल्यावर प्रत्येकाची पावले लगबगीने महात्मा गांधी चित्रप्रदर्शनाकडे वळतात.

With the shaking of the hands, the picture ends. | हातांच्या थरथरत्या स्पर्शाने चित्रप्रदर्शन संपते.....

हातांच्या थरथरत्या स्पर्शाने चित्रप्रदर्शन संपते.....

हुतात्मा दिन विशेष : समाजाचे नैतिक अध:पतन रोखण्याकरिता गांधीविचार हाच पर्याय
पराग मगर वर्धा
चित्र जास्त बोलकी असतात शब्दांपेक्षा. त्यामुळे सबंध सेवाग्राम आश्रम फिरल्यावर प्रत्येकाची पावले लगबगीने महात्मा गांधी चित्रप्रदर्शनाकडे वळतात. गांधीजींचा जीवनपट सुरू होतो. पहायला गेलं तर जास्तीत जास्त १० मिनिटही लागत नाही चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी. या १० मिनिटात मन कितीतरी वर्षांचा प्रवास करून येतं. चित्रप्रदर्शनाच्या अंतीम टप्प्यावर गांधीजींच्या निधनाची काही चित्र पाहताना, त्यांना स्पर्श करताना हात थरथरतो. प्रदर्शन संपते. पण मनात खोलवर मुरत मुरत जाते...
महात्मा गांधी यांच्या चित्ररूपी आठवणी, दस्तावेज, नोंदी आदींचे महात्मा गांधी चित्रप्रदर्शनात एकत्रीकरण करण्यात आले आहे. सहज आणि सोप्प्या पद्धतीने महात्मा गांधी सर्वांना कळावे यासाठी हे चित्रप्रदर्शन तयार करण्यात आले. दररोज शेकडो नागरिक या प्रदर्शनाला भेटी देतात. महात्मा गांधी यांच्या बालपणाने हा प्रवास सुरू होतो. त्यांच्या पोरबंदर येथील टुमदार घराची प्रतिकृती, गांधीजींचं शिक्षण, असा हा प्रवास पुढे त्यांना टे्रनमधून हाकलून देण्याच्या प्रसंगाला पुढे घेत मिठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळ, त्यांनी भोगलेला तुरूंगवास असा प्रवास होत शेवटी सगळे पोहोचतात ते ३० जानेवारी १९४८ या दिवसावर. याच दिवशी गांधीजींची हत्या झाली.
त्या छायाचित्रांना स्पर्श करताना अनेकांचे हात थरथरतात. गांधींजी आपल्यात नाही याची जाणीव होते. त्यामुळे प्रदर्शनातून बाहेर आल्यावरही मन महात्मा गांधींमध्ये अडकून राहातं. आज महात्मा गांधी यांना जाऊन ६८ वर्ष लोटली. पण ते त्यांचं अस्तित्व चित्ररूपातून जाणवत असल्याची भावना चित्रप्रदर्शन पाहणारे नागरिक व्यक्त करतात.

पवनारचा स्तंभ देतो आठवणींना उजाळा
३० जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अस्थिरक्षा पवनार येथील धाम पात्रात शिरवून येथे गोमुख कुंड आणि महात्मा गांधी समाधी स्तंभाची निर्मिती झाली. त्यानंतर १२ फेब्रुवारीला महात्मा गांधी यांच्या तेराव्या दिवसाचे औचित्य साधून सर्वोदय मेळा सुरू झाला. त्यामुळे हा स्तंभ आजही महात्मा गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देतो. बांधकाम विभागाने हे बांधकाम केले. पण सदर काम कधी झाले, कुणाच्या हस्ते झाले याची कुठलीही नोंद येथे नाही.
गांधींचे विचारच सर्व प्रश्नांवर उपाय
जगभरात भयानक दहशतवाद बोकाळला आहे. देशात सध्या असलेली अस्थिरता सामान्य माणसांपासून लपलेली नाही. जल जंगल, जमीन यांचे दोहन भयानक पातळीवर होत आहे. अश्या परिस्थितीते सर्व देश गांधी विचारांकडे झुकत चालले आहे. त्यामुळेच गांधी विचारांची प्रासंगीकता लक्षात घेऊन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच प्रशिक्षण वर्ग, निसर्गाचा अभ्यास, महिला वर्गाला प्रबोधन, दारूबंदी चळवळ आणि गांधीजींची जीवनशैली आदी कार्यक्रम व उपक्रम राबविणे सुरू केले आहे. आजच्या दिवशी त्यांच्या विचारांची गरज प्रकर्शाने जाणवते अश्या भावना सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी व्यक्त केल्या.
गांधींच्या विचारांची प्रासंगिकता अधिक वाढली आहे
महात्मा गांधी यांना जाऊन आज ६८ वर्ष लोटली. आज मागे वळून पाहताना देशातच नाही तर सम्पूर्ण जगात अस्थिरता पसरली आहे. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. ही अस्थिरता राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकही आहे. या सर्वांची घडी नीट बसविण्याचं सामर्थ्य गांधी तत्वज्ञानात आहे. गांधी विचारातच या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहे. सत्तेवर आलेल्या प्रत्येकाने केवळ गांधीजींची प्रतीमा समोर ठेवून नाही तर त्यांचे विचार समोर ठेवून कृती करण्याची गरज आहे. सगळीकडे नैतिक अध:पतन होत आहे. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. याची उत्तरे शोधण्यासाठीच गांधी आश्रमात येण्याऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यावेळी गांधी विचारांची प्रासंगीकता अधिक वाढली आहे अश्या भावना सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव मागे वळून पाहताना व्यक्त करतात.

Web Title: With the shaking of the hands, the picture ends.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.