सात टक्के महागाई भत्त्याचा केंद्राला विसर
By Admin | Updated: January 10, 2015 01:51 IST2015-01-10T01:51:34+5:302015-01-10T01:51:34+5:30
केंद्र शासनाने जुलै २०१४ ला पात्र झालेला सात टक्के महागाई भत्ता देवून सहा महिन्यांचा काळ लोटला.

सात टक्के महागाई भत्त्याचा केंद्राला विसर
वर्धा : केंद्र शासनाने जुलै २०१४ ला पात्र झालेला सात टक्के महागाई भत्ता देवून सहा महिन्यांचा काळ लोटला. असे असले तरी राज्य शासनाने सदर हफ्त्याची घोषणा न केल्याने राज्य शासनाला याबाबीचा विसर तर पडला नाही ना, अशी शंका जिल्ह्यातील कर्मचारी व्यक्त करीत आहे़
निवडणुका असल्या म्हणजे शासनाला समाजातील शेतकरी, कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगार यांची प्रामुख्याने आठवण असते़ आता सर्वच सार्वजनिक निवडणुका संपल्या असल्याने शासन आधी दिलेली सर्वच आश्वासने विसरल्याचे जाणवत आहे़ जेव्हा जेव्हा केंद्र शासन आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता देईल़, त्या महागाई भत्त्याचा हफ्ता जसाच्या तसाच राज्य शासन आपल्या कर्मचाऱ्यांनाही देईल, असा करार राज्य शासन व कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्यामध्ये शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना झाला होता़ त्यानुसार जानेवारी २०१४ पर्यंत राज्य शासनाने हा करार पाळला़ करार पाळताना ३४ महिन्यांचा महागाई भत्ता गहाळ केला. मागे पुढे का होईना पण पात्र झालेला महागाईचा हप्ता कर्मचाऱ्यांना दिला़
मात्र जुलै २०१४ पासून देय झालेला ७ टक्के महागाई भत्ता डिसेंबर १४ संपूनही राज्य शासनाने दिलेला नाही. त्यामुळे शासन हा भत्ता देणार की गोठविणार याबाबत शंका कर्मचारी व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)