बियाण्यांच्या दरात वाढ; शेतकऱ्यांची लूट
By Admin | Updated: June 20, 2014 00:02 IST2014-06-20T00:02:25+5:302014-06-20T00:02:25+5:30
मागील वर्षी खरीप व रबी या दोन्ही हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आता कर्ज घेऊन पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांच्या

बियाण्यांच्या दरात वाढ; शेतकऱ्यांची लूट
आर्थिक फटका : सोयाबीनच्या उगवणशक्तीवर प्रश्नचिन्ह
दारोडा : मागील वर्षी खरीप व रबी या दोन्ही हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आता कर्ज घेऊन पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. अचानक वधारलेल्या बियाण्यांच्या दरातून कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट करीत आहे. या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
नगदी पीक म्हणून जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी गत खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती; पण आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली. यामुळे पीक मातीमोल झाले. उत्पादनातून शेतीला लागलेला खर्चही भरून न निघाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला. अति पावसामुळे मागील वर्षी सोयाबीन डागी निघाले. यामुळे १८०० ते २००० रुपये क्विंटल दराने विकून आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. असे असले तरी शेतकऱ्यांनी उसनवारी, उधार व व्याजाने पैसे उचलून रबी हंगामात पेरण्या केल्या; पण निसर्गाच्या अवकृपेने अवकाळी पावसासह वादळ, गारपीट याचा जोरदार तडाखा बसला. यामुळे रबीतील गहू, हरबरा, कांदा, भुईमुंग ही पिकेही जमीनदोस्त झाली. कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचेच बियाणे वापरण्याचा फुकट सल्ला दिला. मागील वर्षी सोयाबीनच व्यवस्थित पिकले नाही तर घरचे बियाणे शेतकरी कसे वापरणार, याचा कुठेही विचार करण्यात आला नाही. आता सोयाबीन बियाण्याचे भाव २६०० ते ३००० रुपये आहे. शिवाय दुकानदार सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्तती ५० टक्के आहे वा नाही, हे देखील सांगू शकत नाही. यामुळे शेतकरी अधिकच धास्तावला आहे. याकडे लक्ष देत कृषी केंद्र चालकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.(वार्ताहर)