शाळा, आयटीआयसमोरच वाहतात दारूचे पाट
By Admin | Updated: August 26, 2014 23:39 IST2014-08-26T23:39:38+5:302014-08-26T23:39:38+5:30
निकोप, बुद्धिसंपन्न व संस्कारशील शिक्षण देणारे पवित्रमय विद्या मंदिर म्हणजे शाळा होय़ येथील ललिताबाई मुरारका कन्या शाळा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शहरातील अन्य

शाळा, आयटीआयसमोरच वाहतात दारूचे पाट
पुलगाव : निकोप, बुद्धिसंपन्न व संस्कारशील शिक्षण देणारे पवित्रमय विद्या मंदिर म्हणजे शाळा होय़ येथील ललिताबाई मुरारका कन्या शाळा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शहरातील अन्य पालिकांच्या शाळांसमोरच दारूचे पाट वाहताना दिसतात़ खुलेआम सुरू असलेले हे दारूचे अड्डे बंद करण्याकरिता कुणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसते़ यामुळे शहरात मद्यपिंचे ‘रोड शो’ नित्याचीच बाब झाली आहे़ पोलिसांनी याकडे लक्ष देत शहरातील दारूविक्रेत्यांना आवर घालावा, अशी मागणी होत आहे़
दारूबंदी असलेल्या वर्धेतील अमरावती जिल्ह्याला लागून असलेल्या पुलगाव शहरात दारूची कमी नाही़ नदी ओलांडली की अधिकृत दारूविक्रीचा परवाना असलेले बियरबार आढळून येतात़ असे असताना शहरातही मोठ्या प्रमाणात दारूचे वाट वाहताना दिसतात़ शहरातील कित्येक शाळांच्या परिसरातच दारूविक्रेते आपले अवैध व्यवसाय चालवीत असल्याचे दिसते़ भीमनगर परिसरातील शाळा परिसरात सहज दारू उपलब्ध होते़ शिवाय नगर िपरिषद हायस्कूलजवळही दारू मिळते़ यानंतर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या ललिताबाई मुरारका व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कुंपण भिंतीजवळ सर्रास दारूविक्री केली जाते़ शिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या परिसरात खुलेआम दारूविक्री केली जाते़ याच भागातील काही पानठेल्यांवरही दारू आणून दिली जात असल्याचे सायंकाळच्या सुमारास पाहावयास मिळते़ या प्रकारामुळे सायंकाळी या मार्गावर मद्यपिंची गर्दी दिसून येते़ रात्री १०़३० वाजता दुकाने, पानठेले, चहाटपऱ्या, हॉटेल बंद करण्यासाठी सक्ती करणारे पोलीस प्रशासन खुलेआम सुरू असलेल्या दारूविक्रीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते़ यामुळे शहरातील वातावरण ढवळून निघत आहे़ शहराच्या मध्यवस्तीत तसेच अन्य ठिकाणीही दारूविक्री केली जात असल्याचे निदर्शनास येते़ सामाजिक संघटनांनीही शहरातील दारूविक्रीच्या मुद्यावर गप्प राहणेच पसंत केल्याचे दिसून येते़ पोलीस यंत्रणेने शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता दारूविक्रीवर आळा घालावा आणि विके्रत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़(शहर प्रतिनिधी)