थकित चुकाऱ्यांसाठी किसान अधिकारचा बैठा सत्याग्रह
By Admin | Updated: June 11, 2014 00:14 IST2014-06-11T00:14:19+5:302014-06-11T00:14:19+5:30
‘नाफेड’ने खरेदी केलेल्या तूर, हरभरा या शेतमालाच्या मोबदल्याचे ५ कोटी ४४ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना त्वरित मिळावे, या मागणीकरिता किसान अधिकार अभियानच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

थकित चुकाऱ्यांसाठी किसान अधिकारचा बैठा सत्याग्रह
वर्धा : ‘नाफेड’ने खरेदी केलेल्या तूर, हरभरा या शेतमालाच्या मोबदल्याचे ५ कोटी ४४ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना त्वरित मिळावे, या मागणीकरिता किसान अधिकार अभियानच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले़
किसान अधिकार अभियानने ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा हालचाली सुरू झाल्या. सेलू येथे तूर खरेदीतील चुकारे न दिल्याबाबत ‘नाफेड’चे जिल्हा पणन अधिकारी शेख बिलाल यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये दूरध्वनीवरून कळवूनही आपण या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता, कोणतीच कारवाई केल्याचे दिसत नाही. यावर २४ तासांच्या आंत समक्ष भेटून स्पष्टीकरण द्यावे, अशी तंबी देण्यात आली आहे. किसान अधिकार अभियानने शेतमाल खरेदीची रक्कम मिळण्याकरिता आंदोलन सुरू केल्यानंतर नाफेडकडून रक्कम येताच त्वरित ही रक्कम खरेदी-विक्री संघामार्फत संबंधितांना देण्यात येईल, असे २३ मे रोजी दिलेल्या पत्रात मान्य केले होते; पण त्यावर जिल्हा पणन अधिकारी कार्यालय स्तरावरून कोणतीही कारवाई झाली नाही़ नाफेडच्यावतीने सेलू तालुक्यात ६ मार्च रोजी १५० क्विंटल ५ किलो तुरीची खरेदी करण्यात आली़ त्याचे ६ लाख ४५ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. शिवाय नाफेडने जिल्ह्यात खरेदी केलेल्या हरभऱ्याचे ४ कोटी ८१ लाख रुपये आणि इतर ठिकाणी खरेदी केलेल्या तुरीचे ५७ लाख ४२ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. ही रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, याकरिता किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, सेलू तालुकाध्यक्ष विठ्ठल झाडे यांच्या नेतृत्वात २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर किसान अधिकारच्या आंदोलकांना दोन दिवसांची वेळ मागण्यात आली होती.
नाफेडचे जिल्हा पणन अधिकारी शेख बिलाल यांना पत्रही देण्यात आले होते; पण १५ दिवस लोटले असताना कारवाई झाली नाही़
हरभरा आणि तुरीच्या खरेदीची रक्कम कधी मिळणार, याबाबत शेतकरी तसेच किसान अधिकार अभियानला माहिती देण्यात आली नाही.
यामुळे तुरीच्या खरेदीतील थकित रकमेच्या चुकाऱ्याबाबत काय निर्णय झाला, याच्या लेखी माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बसून वाट पाहणार असल्याचे पत्र देत आंदोलन सुरू करण्यात आले़ आंदोलनात अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, तालुकाध्यक्ष विठ्ठल झाडे यांच्यासह गजानन पाहुणे, निवृत्ती तडस, विलास चंदनखेडे, पद्माकर कुत्तरमारे, प्रमोद फुलझेले आदी शेतकरी सहभागी झाले.
(कार्यालय प्रतिनिधी)