सहा गावात क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा

By Admin | Updated: June 8, 2014 00:05 IST2014-06-08T00:05:42+5:302014-06-08T00:05:42+5:30

सद्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे. नागरिकांना गावाच्या बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. काही गावात ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाद्वारे

Saline water supply in six villages | सहा गावात क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा

सहा गावात क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा

अमोल सोटे - आष्टी(शहीद)
सद्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे. नागरिकांना गावाच्या बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. काही गावात ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आष्टी(श.) तालुक्यातील थार, बेलोरा(खुर्द), पंचाळा, हरिषवाडा, चामला, किन्ही या सहा गावात क्षाराचे प्रमाण अधिक आहे. नळाच्या पाण्यातून येणारे पाणी जड आहे. पाणी साठविण्याची भांडी, कुलर, अँल्युमिनिअमच्या वस्तुला मोठ्या प्रमाणात क्षार चढत असतो. माणसाच्या शरीरामध्ये क्षारयुक्त पाणी विविध आजार निर्माण करीत असते. थार गावात पाणीपुरवठा करणारी सर्व उपलब्ध साधने संपुष्टात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गावापासून दोन किमी अंतरावर शेतात असणार्‍या विहिरीतून पाणी आणणे पसंत केले आहे. तापल्या उन्हातही पाणी आणायला दुरवर जावे लागत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बेलोरा(खुर्द) गावात क्षारयुक्त व दूषित पाण्यामुळे आतापर्यंत ३ रुग्णांना डेंग्यू झाला आहे. प्रशासनाने उपाययोजना करण्याचे सोडून थातूर-मातूर कारवाई केल्याचे दाखविल्या जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. पाणीपुरवठय़ात तात्काळ सुधारणा करण्याची मागणी बेलोरावासियांनी वरिष्ठांकडे केली आहे.
तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेला जलशुद्धीकरण केंद्र नाही. त्यामुळे नदी, विहिरी यावरुन थेट पाणीपुरवठा केल्या जात आहे. शेवाळ, चामडोक व इतर किटक, अळ्या पाण्यातून येत आहे. ब्लिचिंग पावडर प्रमाणीत केल्यानुसार टाकल्या जात नाही. त्यामुळे दूषित व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.
हरिषवाडा गाव उंचावर आहे. येथे दरवर्षी पाणीटंचाई असते. गावाला नदीच्या पात्रातून व विहिरीद्वारे पाणीपुरवठा केल्या जातो. या पाण्याचा वास येत असल्यामुळे नागरिक प्रचंड रोष व्यक्त करीत आहे. चामला गावात खाजगी विहिरीवरुन पाणी पुरवठा सुरु आहे. या गावात गवळी समाज मोठय़ा प्रमाणात आहे. दही, ताक, तुप, दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केल्या जातो. मात्र पाण्याची टंचाई व दूषित पाणी गावकर्‍यांना सतावत आहे.
ग्रामीण भागात आरोग्याची सुविधा नसल्यामुळे तालुक्याला यावे लागते. किन्ही गाव डोंगरमाथ्यवर आहे. लाल माती, मुरुम असलेल्या भागात शुद्ध पाणी मिळण्याची अपेक्षा नाही. गावाला लागून नदी आहे. या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो मात्र दूषित पाणी असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पंचाळा गावातही पाण्याचा हाहाकार आहे. गावाला लागून कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक दुरवरुन शेतामधून पाणी आणतात. या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे आजारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
 

Web Title: Saline water supply in six villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.