रिकंडिशनिंग बसगाड्यांतून सुरक्षित वाहतुकीचा प्रयत्न
By Admin | Updated: January 3, 2015 23:06 IST2015-01-03T23:06:29+5:302015-01-03T23:06:29+5:30
जिल्ह्यात कालमर्यादा व रिकंडिशनिंग झालेल्या बसगाड्यांतून सुरक्षित वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वर्षभरापासून एकही नवी गाडी आली नसल्याने उपलब्ध

रिकंडिशनिंग बसगाड्यांतून सुरक्षित वाहतुकीचा प्रयत्न
वर्षभरापासून नवी गाडी नाही : जिल्ह्यात ३०४ गाड्यांतून चालते वाहतूक
रूपेश खैरी - वर्धा
जिल्ह्यात कालमर्यादा व रिकंडिशनिंग झालेल्या बसगाड्यांतून सुरक्षित वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वर्षभरापासून एकही नवी गाडी आली नसल्याने उपलब्ध असलेल्या गाड्यांच्या माध्यमातून नागरिकांना गावी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात पाच आगारातून परिवहन महामंडळाचे काम सुरू आहे. यात एकूण ३०४ गाड्या प्रवाशांच्या दिमतीला आहेत. यातील बऱ्याच गाड्यांची मर्यादा संपली असतानाही त्या रस्त्याने धावत आहेत. गाड्यांची मर्यादा संपल्याने त्या रस्त्याने धावताना कुठे बंद पडतील याचा नेम नाही. तसे अुनभव प्रवाशांना आलेही आहेत. बसगाड्या रस्त्यात प्रवासादरम्यान बंद पडत असल्याने प्रवाशांना त्या मार्गाने जाणाऱ्या इतर गाड्या वा बसस्थानकावरून दुसरी गाडी पाठवून गावी पोहोचविण्याची वेळ महामंडळावर अनेकदा आली आहे. आशा सर्व प्रकारातून जिल्ह्यात परिहवन महामंडळ सुरक्षा सप्ताह साजरा करीत असल्याचे दिसते. जिल्ह्यातकरिता २० नवीन बसगाड्या मागविण्यात आल्याची माहिती आहे.
४० मुदतबाह्य गाड्या प्रवाशांच्या दिमतीला
मोटर वाहन कायद्यानुसार साधारणत: एका बसगाडीचा कालावधी आठ वर्षे देण्यात आला आहे. याकालावधीत बसगाडी प्रवासायोग्य असल्याचे समजल्या जाते. वर्धेत मात्र हा कालावधी झालेल्या जवळपास ४० गाड्या रस्त्याने धावत असल्याची माहिती आहे. यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
तब्बल २५ गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार
कालमर्यादा संपून वाहतूक करणाऱ्या सुमारे २५ गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. या गाड्या अजूनही रस्त्यावर धावत असून नवीन गाड्या येईपर्यंत या गाड्या रस्त्यावर धावतच राहणार आहेत. अशातच या बसगाड्या कुठे बंद पडतील याचा मात्र नेम नाही. मात्र नाईलाज असल्यामुळे परिवहन महामंडळाचा हा खटाटोप करावा लागत आहे.
जिल्ह्याकरिता २० नवीन गाड्यांचा प्रस्ताव
नवीन बसगाड्यांची निर्मिती काही दिवसांपासून बंद होती. या कारणाने नव्या गाड्याच उपलब्ध झाल्या नाहीत. वर्षभरापासून गाड्यांची निर्मिती सुरू झाली. वर्धा आगाराकडून २० गाड्यांचा प्रस्ताव आहे, परंतु एकही नवी गाडी मिळालेली नाही. इतरत्र वापरलेल्या गाड्याच या विभागाच्या माथी मारल्या जात असल्याचे वास्तव आहे. या गाड्यांना रिकंडीशनिंग करूनच सेवा देणे सुरू आहे.