त्याग आणि एकरूपतेच्या मूर्ती ‘कस्तुरबा’

By Admin | Updated: February 22, 2016 02:22 IST2016-02-22T02:22:37+5:302016-02-22T02:22:37+5:30

स्वच्छताप्रिय, पारंपरिक पद्धतीची वेशभूषा, ठेंगणी कदकाठी; पण हट्टी स्वभावाच्या, गांधीजींच्या सामाजिक कार्यात सहभागी होऊन स्वत:चे अस्तित्व न ठेवता ...

The sacrifice of sacrifice and unity is 'Kasturba' | त्याग आणि एकरूपतेच्या मूर्ती ‘कस्तुरबा’

त्याग आणि एकरूपतेच्या मूर्ती ‘कस्तुरबा’

दिलीप चव्हाण सेवाग्राम
स्वच्छताप्रिय, पारंपरिक पद्धतीची वेशभूषा, ठेंगणी कदकाठी; पण हट्टी स्वभावाच्या, गांधीजींच्या सामाजिक कार्यात सहभागी होऊन स्वत:चे अस्तित्व न ठेवता एकरूप व समर्पनाची भावना ठेवून राष्ट्रीय कार्याला वाहून घेणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजे कस्तुर गांधी होय. गांधीजींनी त्यांच्या नावाच्या मागे ‘बा’ लावल्याने त्या संपूर्ण आश्रमच नव्हे तर जगाच्या ‘कस्तुरबा’ झाल्या. सहा वर्षे सेवाग्राम आश्रमात वास्तव्य करून २२ फेब्रुवारी १९४४ रोजी पुणे येथे बंदीवासात त्यांचे निधन झाले. एकरूपतेची भावना ठेवणाऱ्या कस्तुरबा यांचा स्मृतिदिन ‘मातृदिन’ म्हणून आश्रमात साजरा केला जातो.
‘फुलसंगे मातीस वास लागे’, असे म्हटले जाते; पण महान व तत्वावर आधारित जीवन जगणाऱ्यांच्यासोबत राहणे म्हणजे महान कठीनच. कस्तुरसोबतही असेच काहीसे झाले. वयाच्या १३ व्या वर्षी बापूंशी त्यांचा विवाह झाला. त्या अशिक्षित आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या स्व-मताच्या आणि जिद्दी स्वभावाच्या असल्याने अनेकदा बापूंसोबत असहकाराची भूमिका घेत. सार्वजनिक जीवनात कार्य करताना त्यांचे विचार व मन हळूहळू फुलू लागले आणि त्या बापूंच्या सर्व कार्यात आनंदाने सहभागी होऊ लागल्या. १९०६ मध्ये गांधीजींनी ब्रह्मव्रत स्वीकारले. पती-पत्नीचे नाते मित्रात बदलून गेले. आश्रमीय जीवन पद्धतीला सुरुवात झाली.
१६ जून १९३६ रोजी बा बापूसोबत सेवाग्रामला आल्या. आश्रम स्थापनेचा आणि येथेच राहण्याचा निर्णय झाला. सार्वजनिक जीवनाचा अंगिकार केल्याने स्वतंत्र्य व्यवस्था कुणासाठीच नव्हती, हे आदीनिवासवरून दिसून येते. याच कुटीमध्ये बापू, बादशाह खान, मुन्नालालजी, बापू राहत असे. स्त्रीला काही मर्यादा होती. त्यांना कुचंबल्यासारखे होत होते; पण सांगणार कुणाला. हिऱ्याचे मूल्य त्याच्या पैलंूवर असते. संघर्षमय जीवनातून त्या अधिकच ‘मी’ तून ‘आपण’ बनल्या. जमनालाल बजाज यांच्या प्रयत्नातून बाजूलाच एक झोपडी बनविण्यात आली. त्यात त्या राहू लागल्या. आश्रमात येणाऱ्या महिलांची व्यवस्था त्यांच्या कुटीत करण्यात येत असे.
आश्रमवासियांचा रसोडाही होता. स्वतंत्र्य व्यवस्था नव्हती. त्या स्वत: जातीने लक्ष देत होत्या. स्वच्छता, निटनेटकेपण याकडे लक्ष असायचे. जेवण पंगत पद्धतीचे असल्याने बापूंचे जेवण संपेपर्यंत त्या लक्ष ठेवत. एकदा मुलांना गावाला जायचे असल्याने डबा बांधून दिला. ही गोष्ट बापूंना माहिती झाली. ‘इतर मुलांसाठी असाच डबा बांधून देणार का’ असा प्रश्न बा यांना केला. बापूंच्या प्रश्नाचा रोख लक्षात आल्याने ‘ती पण माझीच मुले असल्याने आनंदाने बनविणार’ असे म्हणताच बापूंनी स्मीतहास्य केले.

आश्रमात रामायण, गीता, काही पत्रिका त्या नियमित वाचत असे. मीरा बहन व अन्य महिलांशी त्यांचा संवाद होई. गांधीजींनी विनोबाजींना गिताई शिकविण्याची इच्छा असल्याचे सांगितले. विनोबांनी त्यांना बारावा अध्याय शिकविला. संत तुकाराम, संत नामदेव, रामकृष्ण परमहंस या महानुभावांनी पत्नीला जो दर्जा दिला, जे नाते जोपासले तसेच नाते गांधी व बा चे होते. म्हणूनच बापूंनी कस्तुरचे कस्तुरबा केले.
१९४२ चा भारत छोडोचा ठराव आदीनिवासमध्ये झाला. करा व मराचा नारा दिला. मुंबईला ९ आॅगस्ट १९४२ ला सत्याग्रह व सभा ठरली. आॅगस्ट रोजी बकुळीचे झाड लावले. ५ आॅगस्ट रोजी बापूसोबत बा सत्याग्रहास मुंबईला रवाना झाल्या. बापू व सहकाऱ्यांना अटक झाली. बां यांनी सभेला संबोधित केले. बा यांना अटक करून पुण्याच्या आगा खॉ पॅलेसमध्ये ठेवले. येथे प्रकृती बिघडल्याने बापूंनी त्यांची सुश्रूषा केली. अखेर २२ फेब्रुवारी १९४४ रोजी त्यांचे निधन झाले.

Web Title: The sacrifice of sacrifice and unity is 'Kasturba'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.