आरक्षणाच्या नियमांची सर्रास पायमल्ली
By Admin | Updated: May 25, 2014 23:47 IST2014-05-25T23:47:27+5:302014-05-25T23:47:27+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार यांच्यासाठी जागा राखीव असतात. प्रत्यक्षात या राखीव जागेच्या सीटमागे कुणासाठी राखीव असे लिहिलेले असते.

आरक्षणाच्या नियमांची सर्रास पायमल्ली
तळेगाव (श्या) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार यांच्यासाठी जागा राखीव असतात. प्रत्यक्षात या राखीव जागेच्या सीटमागे कुणासाठी राखीव असे लिहिलेले असते. परंतु बसचा वाहक या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने अंध-अपंगासह महिला प्रवाशांना राखीव जागेऐवजी उभे राहून प्रवास करावा लागत असल्याने या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे. राज्य महामंडळाच्या प्रवासी बसमध्ये ठराविक आसन हे राखीव आहे. या आसनांमागे त्या कोणत्या व्यक्तीकरिता राखीव आहे, हे नमूद आहे. तसेच ज्या आसनामागे नाव नसेल ती सर्व आसने सर्वसामान्य प्रवाशासाठी उपलब्ध आहेत असे समजण्यात येते. राज्य परिवहन महामंडळाद्वारे याच उदात्त हेतूने बसमध्ये राखीव जागा ठेवल्या असल्या तरी वाहकाद्वारे अमंलबजावणी होत नसल्याने महामंडळाच्या उद्देशाला केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे दिसते. सध्या लग्नसराईची धूम आहे. बसस्थानकावर प्रवाशांची झुंबड उडत असते. बसस्थानकावर बस येताच मिळेल ती जागा बळकावण्याकरिता प्रवाशांची बरीच धावपळ होते. विशेष म्हणजे आबालवृद्धांना डावलत तरुणतुर्क जागा मिळविण्यासाठी धडपड करतात. बसमध्ये खिडकीमधून रुमाल, दुपट्टा व कॅरीबॅग टाकून ती जागा जणू आरक्षित झाली या अविर्भावाने प्रवासी वावरतात. अंध, अपंग व महिलांना गर्दीमधून वाट काढत जागा मिळविणे शक्य होत नाही. परिणामी महामंडळाद्वारा त्यांची हक्काची जागादेखील त्यांना बसायला मिळत नाही. आमदार व खासदार या बसमध्ये प्रवास करीत नाही हे प्रवाश्यांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे या राखीव आसनावर प्रवाशी बिनदिक्कतपणे बसतात. वाहकांना माहिती असताना ते देखील नियमाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. अंध अपंगांसाठी राखीव जागा असने गरजेचे आहे. तशी ती देण्यातही आली आहे. शासनाने त्यांच्यासाठी विशेष सुविधा दिली असली तरी त्यांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. नियमानुसार बसमध्ये राखीव आसन असलेल्या जागी सदर व्यक्तीला बसायला मिळणे अवश्यक आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.एखादे वेळी कुणी नियमाला बोट धरून वाद घातल्यास हा वाद विकोपाला जातो. प्रसंगी हाणामारीच्या घटना बसमध्ये नव्या राहिल्या नसल्याचे प्रवासी सांगत असतात. त्याचप्रकारे सुट्या पैशातूनही नियमित विवाद होण्याच्या घटना वाढल्या आहे. याकडे महामंडळाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)