भवानी तलावात मृत मास्यांचा सडा

By Admin | Updated: February 13, 2016 01:27 IST2016-02-13T01:27:15+5:302016-02-13T01:27:15+5:30

मासेमारीकरिता लिलावात घेतलेल्या तलावातील मास्यांचा अचानक मृत्यू होत आहे. हा प्रकार कशामुळे याचा अद्याप उलगडा झाला नाही.

The rotten beetle in the Bhavani lake | भवानी तलावात मृत मास्यांचा सडा

भवानी तलावात मृत मास्यांचा सडा

कारण गुलदस्त्यात : आठवडाभरापासून मासेमाऱ्यांचे लाखावर नुकसान
वर्धा : मासेमारीकरिता लिलावात घेतलेल्या तलावातील मास्यांचा अचानक मृत्यू होत आहे. हा प्रकार कशामुळे याचा अद्याप उलगडा झाला नाही. तळेगाव (टालाटुले) येथील भवानी तलावात सुरू असलेल्या या प्रकारामुळे मासेमाऱ्यांत भीती पसरली आहे. हा तलाव लिलावात घेणाऱ्याचे आतापर्यंत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तळेगाव(टा.) ग्रामपंचायत अंतर्गत असलेला भवानी तलाव हा मासेमारीकरिता लिलावाने देण्यात येतो. हा तलाव मनोहर शिरपूरकर, शेषराव नान्हे, श्रीराम मोरे, मारोती कंडे, भास्कर शिरपूरकर या पाच जणांनी भाडेतत्त्वावर घेतला. त्यांनी लिलावाने तलाव घेतल्यानंतर येथे मत्स्यबीज टाकले. त्याचे उत्पादन येईल या आशेत असताना या तलावातील मासे एकाएकी मृत पावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तलाव परिसरात मृत मास्यांचा सडा पडलेला असून त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.
हा प्रकार गत आठवड्यापासून सुरू असल्याची माहिती या व्यावसायिकांनी दिली. यामुळे व्यावसायिकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मासे मरत असल्याने लिलावाची रक्कम अशी भरावी, असा प्रश्न पडला आहे. संबंधीत विभागाने याची तपासणी करावी अशी मागणी होत आहे. तलावातील मास्यांचा मृत्यू नेमका कशाने होत आहे, याचा खुलासा अद्याप झाला नाही. शुक्रवार बाजाराचा दिवस असल्याने मासेमारांनी हाती आलेले उत्पादन बाजारात नेण्यावर भर दिला. त्यांच्याकडून मत्स्यविभागात तक्रार करण्यात आली नाही. काही मासेमार पशुसंवर्धन विभागात गेल्याची माहिती आहे. तेथून त्यांना तक्रारीकरिता कोणत्या विभागात जावे याची माहिती देण्यात आली नसल्याची ओरड आहे. (तालुका प्रतिनिधी)

पशुसंवर्धन विभागाकडून दखल घेण्याची मागणी
हा प्रकार एका दिवसाचा नसून तो गत आठ दिवसांपासून सुरू असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे. मास्यांच्या मृत्यू प्रकारात आतापर्यंत सुमारे एक ट्रॉली मास्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. असे असताना या पाचही व्यावसायिकांकडून या प्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार करण्यात आली नाही. यामुळे मास्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणी तक्रार झाल्यास चौकशीअंती मासे मरण्याच्या कारणाचा खुलासा होईल. काही मासेमार शुक्रनारी पशुसंवर्धन विभागात तक्रार करण्याकरिता गेल्याची माहिती आहे. नियमानुसार मासेमारांनी त्यांची तक्रार मत्स्यविभागात करणे गरजेचे आहे.

Web Title: The rotten beetle in the Bhavani lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.