कोटींच्या रस्त्याचे चार वर्षांपासून भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:18+5:30

ऑक्टोबर २०१६ हा काम सुरू करण्याचा दिनांक होता. काम सुरूही झाले. धुनिवाले चौक ते आर्वी नाका आणि पुढे पावडे चौकापर्यंतचे रस्ता बांधकामात नियोजनाच्या अभावात पूर्णत्वास गेले. या बांधकामात कंत्राटदाराने प्रचंड अनागोंदी कारभार केला.

Roads of crores of soils have been soaked for four years | कोटींच्या रस्त्याचे चार वर्षांपासून भिजत घोंगडे

कोटींच्या रस्त्याचे चार वर्षांपासून भिजत घोंगडे

ठळक मुद्देपावडे चौक-धंतोली : बांधकाम विभागही मौन बाळगून

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील चार वर्षांपासून पावडे चौक ते धंतोली चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण रखडले आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून कुठल्याही हालचाली नाहीत. हे काम कधी पूर्णत्वास जाणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
धुनिवाले चौक ते आर्वी नाका- पावडे चौक-धंतोली चौकापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाला आणि सिमेंटीकरणाला मंजुरी मिळाली. याकरिता २५ कोटींचा निधी मंजूर झाला. मुंबई येथील जे पी. एंटरप्रायजेस कंपनीला बांधकामाचा कंत्राट मिळाला. रस्त्याचे चौपदरीकरण, सिमेंटीकरण, सिमेंट नाली बांधकाम, दुभाजक आणि फुटपाथ बांधकाम आदी कामांचा यात समावेश होता.
ऑक्टोबर २०१६ हा काम सुरू करण्याचा दिनांक होता. काम सुरूही झाले. धुनिवाले चौक ते आर्वी नाका आणि पुढे पावडे चौकापर्यंतचे रस्ता बांधकामात नियोजनाच्या अभावात पूर्णत्वास गेले. या बांधकामात कंत्राटदाराने प्रचंड अनागोंदी कारभार केला. बांधकामात अनेक ठिकाणी सिमेंटचा नाममात्र वापर केल्याने बांधकामानंतर अल्पावधीतच पॅचिंग करण्याची नामुष्की ओढवली. तर बॅचलर रोडवर बांधकामादरम्यान नालीवरील स्लॅब कोसळला. त्यामुळे कामाच्या दर्जाविषयी नागरिकांशी प्रश्न उपस्थित केला. आर्वी नाका चौकात अनेकांच्या अतिक्रमणाला अभय देत ते न काढताच बांधकामाचा घाट घालण्यात आला. मात्र, कंत्राटदाराने न जुमानता अधिकारी, लोकप्रतिनिधींशी असलेल्या लागेबांध्यामुळे बांधकाम सुरूच ठेवले. आज अतिक्रमणामुळे आर्वी नाका चौकातील वळणावर रस्ता निमुळता झालेला आहे.
पावडे चौकापर्यंत रस्ता बांधकाम पूर्णत्वास गेले असून चार वर्षांपासून धंतोली चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाचे भिजत घोंगडे कायम आहे. काम पूर्णत्वास गेले नसताना कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने देयकही अदा केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. या रस्ता बांधकामाची चौकशी करण्यात यावी, धंतोली चौकापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम तातडीने पूर्णत्वास नेण्याची मागणी होत आहे.

फलकावरील माहिती पुसली
कामाच्या माहितीचा फलक धंतोली चौकात लावण्यात आला आहे. चार वर्षांचा कालावधी लोटूनही बांधकाम पूर्णत्वास गेले नाही. फलकावर नमूद केलेली माहिती ठळकपणे नागरिकांना दिसू नये याकरिता निळ्या रंगाने ही माहिती पुसण्याचा प्रताप करण्यात आला आहे.
त्यामुळे या मार्गाचे काम पूर्णत्वास जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता कामाचा कंत्राट आणि निविदा ही धंतोली चौकापर्यंत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा निधी गडप तर केला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे संबधित विभागही जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Roads of crores of soils have been soaked for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.