घोराड येथील नदी घाटाचे रूप पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:25 IST2018-02-14T22:24:53+5:302018-02-14T22:25:22+5:30
विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसराला लागून असलेल्या नदी घाटाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.

घोराड येथील नदी घाटाचे रूप पालटणार
ऑनलाईन लोकमत
वर्धा : विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसराला लागून असलेल्या नदी घाटाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सर्व घाटाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे बोर नदीच्या पात्रातील या घाटांचे रूप पालटणार आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २६३ लक्ष रूपये निधी पर्यटन व उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी मंजूर केला आहे.
घोराड येथे दरवर्षी केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो. विविध धार्मिक कार्यक्रम यानिमित्ताने येथे पार पडतात. त्या दृष्टीकोनातून येथे आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. यात बोर नदी पात्राचे सौंदर्यीकरण व घाट बांधकाम तसेच शौचालय बांधकामसाठी ३६.६२ लाख, चेजिंग रूमसाठी ८१.९५ लाख, घाट पायºया ५५ लाख, भू सपाटीकरण व बगीचा कामासाठी ३४. १० लाख, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण यासाठी १० टक्के २०.७६ लाख, प्रकाश व्यवस्था १०.३८ लाख असा निधी खर्च करण्यात येणार आहे. यातील ३० लाखांची रूपयांची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळती करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१८ पूर्वी या कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दिली. आ. डॉ. पंकज भोयर यांच्या मते या निधीतून घोराड गावाला पर्यटनाच्या दृष्टीने नवीन ओळख मिळून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटन विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. शिवाय प्रत्येक क्षेत्र विकासासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
देऊळ परिसराचाही होणार विकास
बोर नदीच्या काठावर असलेल्या घोराड येथील श्री संत केजाजी महाराज यांचे मंदिर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच विठ्ठल रूख्माई मंदिरही आहे. याशिवाय अनेक मंदिरांचा समूह बोरनदीच्या घाटाला लागूनच आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने कामे करताना या मंदिर परिसराच्या सभोवताल कामे होण्याची शक्यता आहे. तीन टप्प्यात हा निधी वितरित केला जाणार असून पहिल्या टप्प्यातील निधीतून मार्च महिन्यापूर्वी कामे सुरू होणार आहेत.