अहिंसेच्या दूताला आदरांजली
By Admin | Updated: October 3, 2016 00:38 IST2016-10-03T00:38:48+5:302016-10-03T00:38:48+5:30
येथील ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात रविवारी भरगच्च कार्यक्रमांनी शांती दूताला आदरांजली अर्पण करण्यात आली.

अहिंसेच्या दूताला आदरांजली
सेवाग्राम आश्रमात पर्यटकांची गर्दी : सायंकाळपर्यंत ३३ हजार मीटर सूत कताई
सेवाग्राम : येथील ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात रविवारी भरगच्च कार्यक्रमांनी शांती दूताला आदरांजली अर्पण करण्यात आली. पहाटे सामूहिक प्रार्थनेने सुरू झालेल्या कार्यक्रमात दिवसभर सूतकताई, अतिथींचे मार्गदर्शन व शासनाच्या चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. सकाळपासून राबविण्यात आलेल्या सूतकताई यज्ञात सायंकाळपर्यंत ३३ हजार मिटर सूत कातण्यात आले.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १४७ व्या जयंतीदिनी आश्रमात एका विशेष कार्र्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंबर चौधरी यांची उपस्थिती होती. अतिथी म्हणून खा. रामदास तडस, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, गांधी विचार परिषदचे डॉ. भरत महोदय, आश्रमचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव व माजी अध्यक्ष अॅड. मा. म. गडकरी उपस्थित होते. मान्यवरांचे सूतमाळेने स्वागत करून डॉ. अनिल काकोडकर व डॉ. विश्वंबर चौधरी यांना खादीची शाल, पुस्तक व चरखा भेट देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर म्हणाले, गांधी आश्रमात आल्यानंतर नवीन काही तरी मिळते. तीन वर्षानंतर गांधीजींच्या १५० व्या जयंतीला आपण सामोरे जाणार आहो. देशभर नवीन कार्यक्रम, उपक्रम आणि यातून जनजागृती होण्यासह देशातील समस्यांची उकल करण्यासाठी गांधी विचारांचा आढावा घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याच ठिकाणावरून सबंध देशाला जागृत करून स्वातंत्र्य चळवळ गांधीजींची प्रभावशाली केली. यामुळे गांधीजींची विचारसरणी आणि शांतीच्या मार्गानेच देशातील प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. विश्वंबर चौधरी यांनी महात्मा गांधी यांनी जसा विकासात शेवटच्या व्यक्तीचा विचार केला तसाच शासनाने करावा असे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले. संचालन डॉ. श्रीराम जाधव यांनी केले. आभार भरत महोदय यांनी मानले.
कार्यक्रमाचा प्रारंभ वैष्णव जन तो या भजनाने झाला. बापू कुटी सेवाग्राम आश्रम भाग १ ते २ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आयोजित संपूर्ण कार्यक्रमात आश्रमाचे अधीक्षक भावेश चव्हाण, अशोक गिरी, बाबा खैरकार, शंकर बगाडे, गजानन अंबुलकर, नामदेव ढोले, सुधाकर झाडे, सागर कोल्हे, अरूण लेले, भैय्या मशानकर, प्रदीप उगले, ज्ञानेश्वर रेंगे, अनिल देवतळे, नामदेव पाटील, जालंधर नाथ, अतुल शर्मा, हनुमान पिसुर्डे, सुचित्रा झाडे, संगिता चव्हाण, बघेल, माधुरी भोंगे, प्रभू शहाणे, भावना डगवार, प्रशांत ताकसांडे, आकाश लोखंडे, सिद्धेश्वर कंबरकर, सचिन हुडे इत्यादीसह शाळा महाविद्यालय विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.(वार्ताहर)
पालकमंत्र्यांनी केली चरख्यांची पाहणी
गांधी जयंतीदिनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम आश्रमात हजेरी लावली. प्रार्थना करीत बापूंना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या उपस्थितीत नई तालीम परिसरात सुरू असलेल्या चित्रपट महोत्सवाचा समारोप करण्यात आला. प्रार्थनेच्यावेळी ना. मुनगंटीवार यांच्यासह हिंगणघाट - समुद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व आश्रमातील साधकांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आश्रमात सुरू असलेल्या कताईदरम्यान चरख्यांची माहिती घेतली.