जिल्हा पाणीदार करण्याचा संकल्प
By Admin | Updated: January 31, 2016 02:20 IST2016-01-31T02:19:01+5:302016-01-31T02:20:47+5:30
गाव आत्मनिर्भर करण्याचे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकारण्यासाठी गावांचा विकास करताना प्रत्येक गाव पाण्यासाठी ...

जिल्हा पाणीदार करण्याचा संकल्प
जल परिषद : विविध तज्ज्ञांमार्फत जिल्ह्यातील भुजल साठ्यांवर सादरीकरण
वर्धा : गाव आत्मनिर्भर करण्याचे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकारण्यासाठी गावांचा विकास करताना प्रत्येक गाव पाण्यासाठी आत्मनिर्भर करून वर्धा जिल्हा पाणीदार करण्याचा संकल्प जल परिषदेच्या निमित्ताने करण्यात आला.
याप्रसंगी जिल्ह्यातील पाच सरपंचांनी एक वर्षाचे मानधन जलयुक्त शिवार अभियानासाठी दिल्याचे यावेळी जाहीर केले.
खा. रामदास तडस यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना आता प्रत्येक गावात राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली. माजी खासदार दत्ता मेघे यांनी जलयुक्त शिवार प्रभावीपणे राबवित असताना सरपंच व ग्रामस्थांनी जलसंधारणासाठीर प्रत्यक्ष कृतीतून आपले गाव जलयुक्त करावे, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी प्रास्ताविकातून जलसाक्षरतेची चळवळ सुरू करण्यासाठी सरपंच व सर्व लोकप्रतिनिधींसाठी जलपरिषद असल्याचे सांगितले. माथा ते पायथा यानुसार जलयुक्त शिवार अभियानात २१० गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंधारणाची कामे घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
प्रादेशिक उपसंचालक आय. आय. शाह यांनी भूजल सर्वेक्षणानुसार वर्धा जिल्ह्यातील भूजल स्थिती व करावयाच्या उपाययोजना, जलयुक्त शिवार यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, पाण्याचा ताळेबंद या विषयावर डॉ. महेंद्र नागदिवे, भूजल मुल्यांकन तथा जलसंधारण याविषयावर जलतज्ञ मनोहर सोमनाथे, पावसाच्या पाण्याचे संवर्धन या विषयांवर माधव कोटस्थाने, वर्धा जिल्ह्याची भविष्यातील वाटचाल या विषयावर मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, २४ बाय ७ ग्रामीण पाणी पुरवठा मौजा उमरीचे उपसरपंच सचिन खोसे, अतिशोषित पाणलोटातील जलसंधारण या विषयावर के.के. मराठे आदींनी सादरीकरणातून प्रकाश टाकला. जलपरिषदेचे संचालन सचिन घोडे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, सर्व सदस्य, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व जलतज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी जलयुक्त वर्धा प्रदर्शनाला भेट दिली.(जिल्हा प्रतिनिधी)