रूपेशच्या हत्येबाबत जिल्ह्यातून निषेधाचा सूर
By Admin | Updated: November 15, 2014 01:58 IST2014-11-15T01:58:50+5:302014-11-15T01:58:50+5:30
आर्वी नाका झोपडपट्टी परिसरातील रूपेश मुळेच्या हत्येची चौकशी करून मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाने कंबर कसली आहे.

रूपेशच्या हत्येबाबत जिल्ह्यातून निषेधाचा सूर
वर्धा : आर्वी नाका झोपडपट्टी परिसरातील रूपेश मुळेच्या हत्येची चौकशी करून मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेलू तालुका, अखिल भारतीय बापू युवा संगठण यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले़
वर्धेतील प्रभाग क्ऱ ४ मधील रूपेश हिरामण मुळे यांच्या संशयास्पद मृत्यू तसेच गत काही दिवसांपासून वर्धा शहर व लगतच्या परिसरात घरफोडी व अन्य गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसविण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाची हतबलता हा चिंतेचा विषय बनला आहे़
वर्धेत अनेक दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत आहे़ मागील काही दिवसात हिंगणघाट येथील मुलगी बेपत्ता होणे, नंतर तिचा मृतदेह सापडणे, देवळी येथील मुलगी बेपत्ता होणे आणि आता रूपेश मुळे हा बेपत्ता होवून दुसऱ्या दिवशी त्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडणे या सर्व बाबी कायदा व सुव्यवस्था हाताळणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे उदाहरण आहे़ रूपेशचा मृत्यू नेमका कशाने झाला याची सखोल चौकशी करण्यासाठी सीआयडी चौकशीची मागणी करीत आहे़ शवविच्छेन अहवाल सार्वजनिक करावा व आरोपींना त्वरीत अटक करुन कारवाई करावी आणि झोपडपट्टीवासीयांना न्याय द्यावा, ही मागणी केली़ वर्धेत भाजपच्यावतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, नरेश कोलते, निलेश किटे, अनिकेत उमाटे, प्रकाश पवार, प्रकाश खंडाते, प्रशांत बुरले, प्रदीप ठाकरे व अरविंद कोपरे यांच्यासह शहर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
याच मागणीकरिता सेलू येथे ठाणेदाराला निवदेन देण्यात आले. याचेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अतुल पन्नासे, मोहन वाहुरकर, अमोल कुकुटकार, नितीन थूल, पंढरीनाथजी राऊत, राजेंद्र ठाकरे, अमरदीप सातपुडके, सिद्धार्थ खैरकार, इत्यादींची उपस्थिती होती़(प्रतिनिधी)