लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : बीएसएनएलची लिंक फेल असल्याकारणाने देवळीच्या पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे आरक्षणाची तिकिटे मिळणे बंद झाले आहे. मागील दीड महिन्यापासून ही परिस्थिती निर्माण झाल्याने, देवळी व परिसरातील नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. याबाबत पाठपुरावा करूनसुद्धा सुधारणा होत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. समस्येकडे खासदार अमर काळे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार मागील काही दिवसांपासून देवळीच्या पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे आरक्षणाची सुविधा मिळत आहे. त्यामुळे ही व्यवस्था देवळीकर नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण तसेच दिलासा देणारी ठरली आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून बीएसएनएल प्रशासनाच्या चुकीमुळे ही सेवा बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील शेकडो विद्यार्थी पुणे, मुबंई तसेच इतर मोठ्या शहरात शिक्षणासाठी तसेच नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. त्यामुळे लागत आहे. शिवाय परतीच्या प्रवासात बाहेर गावी जावे लागत आहे. लींक फेल असल्या कारणाने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे.
बसतोय आर्थिक भुर्दडउपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घेता येत नसल्याने अनेकानी खासगीतून तिकीट बुकिंग केले जात आहे. यासाठी अतिरीक्त शुल्क वसूल केले जात आहे.
दीड महिन्यापासून सेवा बंद देवळीतील औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने कार्यरत असून, याठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची तसेच कामगारांची संख्या मोठी आहे. बाहेरील राज्यांतील शेकडो अधिकारी व कामगार येथे सेवेत असल्याने त्यांना राहत्या गावी जाण्यासाठी तसेच परत येण्यासाठी रेल्वे आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे देवळीत आरक्षित तत्काळ तिकिटांची तसेच नियमित रेल्वे आरक्षणाची व तिकिटांची व्यवस्था आवश्यक ठरली आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून ही सेवा बंद असल्याने प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. लिंक फेल असल्याने रेल्वेचे आरक्षण मिळणे ठप्प झाले आहे. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनसुद्धा व्यवस्था होत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. माजी नगरसेवक सुनील बासू व शिक्षण संस्थेचे सचिव अब्दुल रहेमान तंवर यांनी खासदार अमर काळे यांची भेट घेऊन तसेच त्यांना निवेदन देऊन देवळीच्या रेल्वे आरक्षणाची सुविधा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.