शंभर एकरावरील रबी हंगाम धोक्यात
By Admin | Updated: December 2, 2014 23:10 IST2014-12-02T23:10:21+5:302014-12-02T23:10:21+5:30
निम्न वणा प्रकल्पातील घोळ वर्धा जिल्ह्याच्या सेलू, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या प्रकल्पातही लागू होत असल्याचे विदाराक वास्तव आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या

शंभर एकरावरील रबी हंगाम धोक्यात
सिंचन घोटाळा : समुुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यातील व्यथा
सिंदी (रेल्वे) : निम्न वणा प्रकल्पातील घोळ वर्धा जिल्ह्याच्या सेलू, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या प्रकल्पातही लागू होत असल्याचे विदाराक वास्तव आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामचलावू प्रवृत्तीमुळे नजीकच्या गौळ (भोसा) वितरिकेच्या परिसरात असलेल्या १६ शेतऱ्यांना दीड दशकानंतरही सिंचनासाठी पाणी मिळाले नाही.
सांडवा क्रमांक सातची काळजी घेण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. २१ आॅगस्ट २००९ रोजी नंदू देशपांडे व इतरांनी त्यांच्या शेतात धरणाचे पाणी पोहचत नाही, अशी तक्रार दिली होती; मात्र निगरगट्ट शाखा अभियंत्याने त्या तक्रारीतची दखल घेतली नाही, असे देशपांडे यांच्यासह अनेकांचे गाऱ्हाणे आहे.
नागपूर जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्याच्या उपरोक्त तिन्ही तालुक्यात सिंचन व्हावे व विदर्भ सुजलाम् सुफलाम् व्हावा, या उद्देशाने वणा नदीवर वडगावजवळ निम्न वणा प्रकल्प उभारण्यात आला. लोकशाही आघाडी सरकारने २००४ पासून या प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेत. मात्र, धरणाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचले नाही. प्रकल्पाच्या पानचऱ्या, सांडवे, कालवे तयार करताना अनेक नियमबाह्य कामे झालीत. भलत्याच जागी गेट देण्यात आले. नको तेथे पुल बांधून ठेकेदारांना जगविण्यात आल्याची ओरड आहे.
पाच वर्षांपूर्वी २१ आॅगस्ट ०९ रोजी नंदू उर्फ नरेंद्र देशपांडे यांनी त्यासंदर्भात विस्तृत तक्रार सादर केली आहे. पण आश्वासनापुढे कवडीची प्रगती झाली नाही, अशी त्यांची कैफियत आहे. सिंचन घोटाळ्यामुळे चौकशी होणार, या धास्तीपायी गौळ मायनरकडे लक्ष पुरविण्याची उसंत अधिकाऱ्यांना मिळत नाही, असे एका अधिकाऱ्याने नकळत सांगून टाकले आहे.(प्रतिनिधी)