नाफेडची तूर खरेदी अचानक बंद
By Admin | Updated: February 4, 2016 02:13 IST2016-02-04T02:12:33+5:302016-02-04T02:13:02+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी अचानक बंद करण्यात आली.

नाफेडची तूर खरेदी अचानक बंद
आर्वीत अधिकाऱ्यांना घेराव : देवळीत शेतकऱ्यांमध्ये असंतोष
आर्वी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी अचानक बंद करण्यात आली. परिणामी, शेतकऱ्यांचा माल व्यापारी कमी भावात खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. परिणामी, नाफेडची तूर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे बाळा जगताप व शेतकऱ्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना बुधवारी घेराव केला. तूर खरेदीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कृउबासमध्ये नाफेडची तूर खरेदी सुरू होती. यात तुरीला चांगला भाव असल्याने दूरवरून शेतकरी तूर बाजार समितीत घेऊन येत होते; पण गत पाच ते सहा दिवसांपासून नाफेडने अचानक तूर खरेदी बंद केली. परिणामी, शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांना तूर विकावी लागत आहे. यात व्यापारी अल्प भाव देत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटलमागे सुमारे दोन ते तीन हजार रुपयांचे नुकसान होत आहे.
कृउबास सभापती पंजाब राठोड व नाफेडचे अधिकारी सिंग यांना शेतकऱ्यांनी घेराव केल्याने एकच खळबळ उडाली. नाफेडची तूर खरेदी बंद का झाली, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित् केला. यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर शुक्रवारपासून तूर खरेदी करा, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका जगताप व शेतकऱ्यांनी घेतली. यामुळे सभापती व अधिकाऱ्याची कोंडी झाली होती. संबंधितांनी वरिष्ठांशी चर्चा करून शुक्रवारपासून तूर खरेदी सुरू करू, अशा आशयाचे लेखी पत्र दिले. यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले. शुक्रवारपासून नाफेडची तूर खरेदी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.
यावेळी उपसभापती बाळा नांदुरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहराध्यक्ष विनू डोळे, अजय कट्टमवार, सागर निर्मळ, युवा मोर्चा तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, सुधीर जाचक, अरसलान खान, संजू कुरील, प्रशांत क्षीरसागर, माणिक निमकर, प्रशांत रामटेके, सागर सोनटक्के, राहुल गोठाणे, ज्ञानदेव जगताप, बंडू, वाजीद शेख व शेतकरी उपस्थित होते.(तालुका/शहर प्रतिनिधी)
एक हजार प्रती क्विंटल फरकाने शेतकऱ्यांची लूट
देवळी : स्थानिक बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी सुरू केली. यानंतर एकाच दिवसात या केंद्रावरून काढता पाय घेतला. यामुळे तुरीची आवक मंदावली. अन्य मार्केटच्या तुलनेत प्रती क्विंटल एक हजार रुपये फरकाने तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी संतप्त आहे. खासगी व्यापाऱ्यांशी संगनमत करून येथील खरेदी नाफेडने बंद केल्याचा आरोप होत आहे.
येथे २२ जानेवारी रोजी नाफेडच्या खरेदीचा शुभारंभ झाला. या दिवशी ११० पोत्यांची आवक होती. प्रती क्विंटल ७९०० ते ८६२५ दराने केवळ २४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. दुसऱ्याच दिवसापासून खरेदी बंद करण्यात आली. यामुळे खासगी व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कमी भाव देत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. तुरीची आवक ४० क्विंटलपर्यंत घसरली. हिंगणघाट येथे ८,३०० रुपये भाव असताना येथे ६,८०० ते ७,३७५ रुपये भाव देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. १५० ते २०० पोत्यांच्या घरात आवक नसल्याने खरेदी बंद केल्याचे नाफेडद्वारे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे शासनाचे धोरण असल्याने येथे नाफेडची तूर खरेदी सुरू झाली; पण आवक नसल्याचे सांगून ती बंद केली. यामुळे हे सोंग कशासाठी, अशी संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. व्यापाऱ्यांना लाभ देण्यासाठी नाफेडच्या अधिकाऱ्यांचा हा डाव असल्याचा आरोपही होत आहे. सभापती मनोहर खडसे व पदाधिकाऱ्यांनी चौकशी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)