पुलगाव बॅरेज @ ३०० कोटी
By Admin | Updated: January 7, 2015 22:57 IST2015-01-07T22:57:28+5:302015-01-07T22:57:28+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठा केंद्रीय दारूगोळा भांडार, कॉटन मील आणि परिसरातील १३ गावे, हा परिसर पुलगावला जोडला आहे़ या सर्वांना निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहरालगत

पुलगाव बॅरेज @ ३०० कोटी
शासकीय उदासीनता : २०११ ही डेडलाईन असताना काम रखडलेलेच
प्रभाकर शहाकार - पुलगाव
आशिया खंडातील सर्वात मोठा केंद्रीय दारूगोळा भांडार, कॉटन मील आणि परिसरातील १३ गावे, हा परिसर पुलगावला जोडला आहे़ या सर्वांना निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहरालगत पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर मे २००९ रोजी बॅरेजच्या कामाचा शुभारंभ झाला़ २०११ पर्यंत बॅरेजचे काम पूर्ण व्हावे, हे अपेक्षित होते; पण आता २०१४ उलटले तरी बॅरेजला मूर्त रूप आले नाही़ काम पूर्ण होणे तर दूरच बॅरेजचे कामही रखडले आहे. ८५ कोटींच्या या बॅरेजची किमत आता ३०० कोटींवर पोहोचली आहे.
जवळपास ५० हजार लोकसंख्येचे शहर व परिसरातील १३ गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या केंद्रीय दारूगोळा भांडार, कॉटन मिल, रेल्वे स्टेशन आदींच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा या दृष्टीने बरेचदा प्रयत्न झालेत़ वर्धा नदीवर कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बांधण्याचा प्रस्तावही शासन दरबारी रेटण्यात आला होता; पण राजकीय खेळीमुळे हा प्रश्न रेंगाळत राहिला़ यामुळे शहर व परिसरातील जनतेची भर उन्हात पाण्यासाठी पायपीट होत राहिली़़ १९८० मध्ये ठरलेली ही योजना राजकीय उदासीनतेपोटी १९९१-९२ मध्ये ७५ लाखांवर पोहोचली़ यानंतर कित्येक वर्षे कोल्हापूरी बंधाऱ्याचे घोडे पेंड खातच राहीले.
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन यावर कायम उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कोल्हापूरी बंधाऱ्याचा प्रश्न मागे पडला़ यानंतर वर्धा नदीवर ८५ कोटी रुपयांच्या पुलगाव बॅरेज व ९४ कोटींच्या खर्डा बॅरेजची योजना कार्यान्वित करण्यात आली़ मे २००९ मध्ये पुलगाव बॅरेजच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले़ हे काम २०११ पर्यंत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; पण २०१४ नंतरही या कामाला फारशी गती मिळाल्याचे दिसून येत नाही़ जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांची कामे केल्यानंतरही संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला कामाचा मोबदला देण्यात आलेला नाही़ यामुळे हे बांधकाम रखडलेले आहे़ आता कोल्हापूरी बंधाऱ्याप्रमाणेच बॅरेजची स्थिती होणार नाही ना, अशी शंका नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे़
सध्या या बॅरेजची किंमत प्रचंड वाढली आहे़ ८५ कोटींचा बॅरेज ३०० कोटी रुपयांवर पोहोचला असून आता निधी उपलब्ध होणार की नाही, हे सांगणेही कठीणच आहे़ यामुळे पुलगाव व परिसरातील गावांमध्ये पाण्याची सुबत्ता येणार, हे स्वप्न दिवास्वप्न तर ठरणार नाही ना, अशी भीतीही व्यक्त होत आहे़