भौगोलिक सुविधा असतानाही सहा दशकांपासून पुलगाव उपेक्षित

By Admin | Updated: May 31, 2014 23:40 IST2014-05-31T23:40:55+5:302014-05-31T23:40:55+5:30

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे व कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुलगाव शहर व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने पाहिजे तशी ठोस पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे सर्व भौगोलिक सुविधा उपलब्ध

Pulga neglected for six decades despite geographical facilities | भौगोलिक सुविधा असतानाही सहा दशकांपासून पुलगाव उपेक्षित

भौगोलिक सुविधा असतानाही सहा दशकांपासून पुलगाव उपेक्षित

प्रभाकर शहाकार - पुलगाव
जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे व कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुलगाव शहर व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने पाहिजे तशी ठोस पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे सर्व भौगोलिक सुविधा उपलब्ध असतानाही मागील सहा दशकात हा परिसर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला आहे. नव्या नेत्यांकडून तरी या शहराच्या विकासाकरिता कार्य केले जात काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हा परिसर म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला; परंतु गत कित्येक वर्षांपासून या क्षेत्रातील राजकारण म्हणजे राजकीय आखाडा झाला. या आखाड्यातील राजकीय नेत्यांच्या कुस्त्या पाहून टाळ्या वाजविण्याच्या पलिकडे या क्षेत्रातील कार्यकर्ते व मतदारही काहीच करू शकले नाही. या राजकीय कुस्त्याच्या राजकारणात शहर व परिसराकडे सार्‍यांचेच दुर्लक्ष झाले.
राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविणारे सक्षम नेतृत्व या क्षेत्राने दिले आहे. आमदार, खासदार नव्हे तर सत्तेत सहभागी असणारे मंत्रीही दिले; परंतु शहराच्या विकासाकडे मात्र सर्वच जनप्रतिनिधींनी पाठ फिरविली. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत १८८९ साली पुलगाव कॉटन मिल व १९४२ साली स्थापन झालेला केंद्रीय दारूगोळा भंडार जर सोडले तर या भागात सहा दशकात कुठलाही दुसरा मोठा उद्योग येऊ  शकला नाही.
मुंबई-कलकत्ता या रेल्वे मार्गावर असणारे कवठा हे गाव इंग्रज राजवटीत जिल्ह्याचे मुख्यालय होते. या गावालगतच बारामाही वाहणारी वरदा (वर्धा) नदी आहे. परिसरातील भौगोलिक परिस्थिती पाहून इंग्रज शासनाने १८६५ साली या नदीवर रेल्वे पुलांची निर्मिती करीत या गावाला ‘ब्रीज टाऊन’ पुलगाव हे नाव दिले.
पुढे येथील भोगोलिक परिस्थिती व दळणवळणाची व्यवस्था पाहून १८८९ साली नागपूरच्या बुटी परिवारानी येथे कापड गिरणी सुरू करून विकासाची मुहूर्तपेठ केली. पुढे हा उद्योग भरभराटीस येऊन ३५00 कामगारांना रोजगार मिळाला व गावाचे शहरात रूपांतर झाले. तेव्हापासून शहर आहे त्याच स्थितीत आहे.
या शहराचे महत्त्व व उपलब्ध असलेली भौगोलिक परिस्थिती इंग्रजांना कळली व त्यांनी १९४२ साली या शहरात संरक्षण विभागाचा देशातील सर्वात मोठय़ा दारूगोळा भांडाराची स्थापना केली. यातून शहराच्या विकासाला काही प्रमाणात दिशी मिळाली. शहराचा विकास व्हावा म्हणून पुलगाव ते आर्वी           नॅरोगेज रेल्वे सुरू केली. आज या शहरातून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ मार्ग सुरू असताना ही पुलगाव कॉटन मील हा मोठा उद्योग, पुलगाव-आर्वी रेल्वे मार्ग बंद करण्यात आला.
या शहरालगत असलेल्या विशाल जागेवर औद्योगिक वसाहत स्थापन व्हावी असा प्रयत्नही करण्यात आला; परंतु नेत्यांच्या उदासीन धोरणामुळे हेही होऊ शकले नाही. म्हणून की काय? नुकत्याच आलेल्या सत्ता परिवर्तनाच्या लाटेतून एखादा भगिरथ निर्माण होऊन या शहराच्या विकास करील, या प्रतीक्षेत शहर व परिसरातील सर्वसामान्य आहेत.

Web Title: Pulga neglected for six decades despite geographical facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.