तंबाखुजन्य आजाराबाबत जनजागृती
By Admin | Updated: June 21, 2014 01:58 IST2014-06-21T01:58:12+5:302014-06-21T01:58:12+5:30
चैतन्य सेवाभावी संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गिरनाळा (सुकळी) येथे..

तंबाखुजन्य आजाराबाबत जनजागृती
वर्धा : चैतन्य सेवाभावी संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गिरनाळा (सुकळी) येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकारणचे सचिव वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश चंद्रपाल मेश्राम उपस्थित होते. उद्घाटक म्हणून सुकळी(बाई)येथील सरपंच दिलीप खिराळे होते. तसेच प्रमुख अतिथी अॅड. अनिता ठाकरे, अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ अध्यक्ष प्रकाश वाघ, समाजसेवक बाबाराव अडसड उपस्थित होते.
यावेळी बोलताना मेश्राम यांनी भारतीय तंबाखु नियंत्रण कायदे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सिगारेट अधिनियम, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी याची माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानक आणि गाड्यात धुम्रपानास बंदी घातली. केंद्रशासनाने टेलिव्हिजनद्वारे तंबाखुच्या जाहिराती व प्रदर्शनावर बंदी घातली. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकावर गुटखा विक्रीस बंदी घातली. तर २००१-०३ मध्ये तामिळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, गोवा या राज्यांनी अन्य भेसळ प्रतिबंधक कायद्याद्वारे गुटखा उत्पादन आणि विक्री बंदी केली. तसेच सिगारेट व अन्य तंबाखु उत्पादने अधिनियम २००३ यावर बोलताना सदर कायदा २००३ साली संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आला. तसेच या कायद्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या, अशी कायदेविषयक माहिती दिली.
यानंतर बोलताना प्रकाश वाघ यांनी तंबाखु, गुटखा या व्यसनावर माहिती देताना ग्रामगितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मार्गदर्शन केले. जनजागृती करुन व्यसनमुक्त केले. तंबाखुच्या व्यसनावर भजन रचून जागृती केली. तसेच अॅड. ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना तंबाखु ही जगातील मोठी समस्या आहे. तंबाखुमुळे होत असलेल्या मृतांमध्ये बहुतांश व्यक्ती प्रौढ आणि उत्पादक वयोगटातील असतात, हे राष्ट्रविकासासाठी हानिकारक आहे. तंबाखू विरोधी सप्ताहाच्या माध्यमातून जागृती करण्यात सुरुवात केली. ज्याचा मुख्य उद्देश तंबाखु विरोधी प्रचार करणे आणि तंबाखुमुळे होणाऱ्या मृत्यूची व विविध रोगाची माहिती जनसामान्यांना देणे आवश्यक आहे. यावेळी उपस्थित मंडळींना व्यसनमुक्त होण्याची सामुहिक शपथ घेतली. कार्यक्रमाचे संचालन पाटील यांनी केले तर आभार अॅड. ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला उपस्थित मंडळीना तंबाखु जागृतीबाबतचे व्यसनमुक्तीकरिता माहिती म्हणून जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्यावतीने गावकरी मंडळींना माहितीपत्रक देण्यात आले.