शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी सुविधा प्रदान करा
By Admin | Updated: June 17, 2016 02:31 IST2016-06-17T02:31:53+5:302016-06-17T02:31:53+5:30
शेतीकरिता लागणारे बी-बियाणे, खत व कीटकनाशकांचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी सुविधा प्रदान करा
अनियमित वीजपुरवठा : शेतकरी कामगार संघर्ष परिषदेची मागणी
वर्धा : शेतीकरिता लागणारे बी-बियाणे, खत व कीटकनाशकांचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर शेतीसाहित्य यावे. तसेच नियमित वीज पुरवठा करण्यात यावा, तसेच या सुविधा पेरणीपूर्वी प्रदान करण्याची मागणी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.
विदर्भात ६ हजार मेगावॅट वीज तयार होते. विदर्भाकरिता २२०० मेगावॅट वीज येते. यात वाढ करुन ३ हजार मेगावॅटपर्यंत वीज देण्यात यावी. यामुळे शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा भासणार नाही. भारनियमनाचा सामना करावा लागणार नाही याची शासनाने दखल घ्यायला पाहिजे.
शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी १०० टक्के कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. सत्ता स्थापन करताना शेतकऱ्यांना दिलेले वचन अद्याप पाळले नाही. शेतकऱ्यांना केवळ आश्वास्न दिले. शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिल्याशिवाय शेतकरी आतमहत्येचा प्रश्न निकाली निघणे शक्य नाही.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व समाज कल्याण विभागामार्फत शेतकऱ्यांना ताडपत्री, पाईप, स्पे्रपंप, शेती साहित्य दिले जाते. शेतकऱ्यांना यापुढे याचा थेट लाभ मिळावा.
शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. शेतात विहिरी व मोटारपंप देण्यात यावे. शेतकऱ्यांना सिंचनाकरिता निम्न वर्धा प्रकल्पाचे मिळायला हवे. प्रकल्पाचे पाणी मिळाल्यानंतर येथील शेतकरी वर्षातून दोनदा उत्पन्न घेऊ शकतो. यासह शेतमजुराला काम मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. तसेच शेतमजुरावर उपासमारीची वेळ येणार नाही. याकरिता सत्ताधाऱ्यांनी तातडीने निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
यासह बँकेकेडे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात सवलत मिळावी. ज्या शेतकऱ्यांनी एक रकमी परतफेड योजनेत थकीत कर्जाचा भरणा केला आहे. अशा शेतकऱ्यांना खरीप सन २०१६ चे पीक कर्ज देण्याचे आदेश संबंधित बँकांना देण्यात यावे. ज्यामुळे या शेतकऱ्यांची जमीन पडीत राहणार नाही. जिल्हाधिकारी यांनी याबाबत सर्व बँकेला पत्र पाठवून शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या विविध मागणीचे शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर निघोट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदन सादर करताना धनराज बालपांडे, ज्ञानेश्वर परबत, प्रेमदास शेंदरे, दिंगाबर झाडे, शोभा वानखेडे यासह पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)