सर्व शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत पीककर्ज द्या
By Admin | Updated: June 17, 2016 02:31 IST2016-06-17T02:31:03+5:302016-06-17T02:31:03+5:30
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करताना सर्व बॅँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.

सर्व शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत पीककर्ज द्या
किशोर तिवारी : संयुक्त बैठकीत सूचना
वर्धा : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करताना सर्व बॅँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. बॅँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिककर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत बॅँकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध विभाग प्रमुख यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना किशोर तिवारी बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, प्रशांत इंगळे तिगावकर, मिलिंद भेंडे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, अग्रणी बॅँक प्रबंधक विजय जांगडा, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिककर्ज देताना खासगी सावकाराकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना करताना तिवारी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८० टक्केपेक्षा अधिक शेतकरी कृषी कर्जांतर्गत यावे यासाठी अडीच लाख रुपर्यांपर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्ज पुनर्गठणाची सुविधा असल्याने अद्याप कर्ज न घेतलेले व ज्यांना कर्ज हवे आहे, अशा सर्व शेतकरी खातेदारांना कर्ज उपलब्ध करून द्या, असे निर्देश बॅँकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
पिककर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरवून दिले असले तरी कर्ज मागणीसाठी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळेपर्यंत अर्ज वाटप सुरू ठेवा. यासाठी कमीत कमी वेळेत व त्वरित कर्ज मिळेल, अशी पद्धत लागू करा. जिल्ह्यात कर्ज वाटपामध्ये दिरंगाई करणाऱ्या बँक व्यवस्थापकांविरूद्ध कार्यवाही करण्याचे निर्देशही तिवारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत.(कार्यालय प्रतिनिधी)
शासकीय अनुदान कपात करू नका
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून कर्ज वसुली केली आहे, अशा शेतकऱ्यांची वसूल केलेली रक्कम त्वरित संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करा. यापुढे शासकीय अनुदान कर्ज खात्यात वळते करू नका, अशा स्पष्ट सूचना यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.
पिककर्जाबाबत आलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेताना ते पूढे म्हणाले की, प्रत्येक बँकांनी पिककर्ज वाटप सुरू आहे, याबाबत ठळकपणे दिसेल, असे फलक लावावे. त्यावर शाखा व्यवस्थापकाचे सर्व प्रमुख दूरध्वनी शेतकऱ्यांसांठी उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
बॅँकांनी कर्ज पुरवठा करताना शेतकरी कर्जासाठी बॅँकेत येतील याची प्रतीक्षा न करता प्रत्येक गावातील शेतकरी सदस्यांच्या यादीनुसार प्रथम कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बॅँकेच्या कक्षेत आणून त्यांना प्राधान्याने कर्ज पुरवठा करावा. बॅँकांनी यापुढे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन पिककर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वागत करून प्रास्ताविक भाषणात जिल्ह्यात ४ हजार ३७७ शेतकरी सदस्यांचे ४५ कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. २७ हजार २७७ शेतकऱ्यांना २९१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण झाले असून येत्या सात दिवसांत १०० कोटींचे कर्ज वाटप पूर्ण होईल. ३० जूनपर्यंत सरासरी ७०० कोटींचे कर्ज वाटप पूर्ण करून जिल्ह्यात ८० टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध होईक़ यासाठी प्रत्येक बँकांनी सुटीच्या दिवशीही बॅँका सुरू ठेवून कर्ज वाटप करावे. कर्ज वाटपासाठी आवश्यक असलेले सातबारा, आठ अ तसेच आवश्यक दस्ताऐवज उपलब्ध करून देण्यात येत आहे. कर्ज पुरवठ्यासंदर्भात तहसीलदारांनी नियमित आढावा घेऊन प्रत्येक बॅँकनिहाय माहिती घ्यावी, असेही तिवारी यांनी सांगितले.
अग्रणी बॅँक प्रबंधक विजय जांगडा यांनी बॅँकनिहाय कर्ज वितरणाबाबत दिलेले उद्दीष्ट व कार्यवाहीबाबत माहिती दिली.