नियोजनशून्यतेमुळे सिंचनाची समस्या
By Admin | Updated: February 6, 2016 02:20 IST2016-02-06T02:20:32+5:302016-02-06T02:20:32+5:30
लोअर वर्धा मुख्य कालव्याच्या जागेचे चुकीच्या पद्धतीने सर्व्हेक्षण करण्यात आल्यामुळे या परिसरातील ईसापूर, एकपाळा, काजळसरा, वाटखेडा, टाकळी खोडे आदी ...

नियोजनशून्यतेमुळे सिंचनाची समस्या
देवळी : लोअर वर्धा मुख्य कालव्याच्या जागेचे चुकीच्या पद्धतीने सर्व्हेक्षण करण्यात आल्यामुळे या परिसरातील ईसापूर, एकपाळा, काजळसरा, वाटखेडा, टाकळी खोडे आदी गावातील दोन हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे. जमिनीचा चढाव असल्यामुळे या भागात मुख्य कालवा किंवा उपकालवा नेणे शक्य नसल्याचे प्रकल्पाचे अधिकारी सांगत आहे. परंतु कालव्याची ही जागा चुकीच्या पद्धतीने तसेच कुणाचेतरी दबावात येवून निवडण्यात आल्यामुळे हा गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
लोअर वर्धा प्रकल्पांतर्गत संपूर्ण देवळी तालुका सिंचनाखाली आला असल्याचा गाजावाजा होत आहे. शेतापर्यंत सिंचन व्यवस्था करणारी पाटचऱ्यांची कामे पूर्णत्त्वास येण्याआधीच लोअर वर्धाचे पाणी शेतकऱ्यांना दिले जात आहे. परंतु नितांत गरज असलेल्या भागात कालव्याचे पाणी नाही तर दुसरीकडे गरज नसलेल्या काळीच्या शेत परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असल्याची शोकांतिका आहे.
एकपाळा शिवारातील लोअर वर्धाचा मुख्य कालवा रमेश मरघाडे, चकोले, विष्णु वैद्य व इतर कास्तकारांच्या शेतजमिनी असलेल्या खोलगट भागातून घेण्यात आला. हाच कालवा डॉ. चोरे, वाटखेडा चौकी, एकपाळा व वाटखेडा शिवार अश्या जमिनीच्या चढावाच्या बाजूने घेतला असता तर या परिसरातील संपूर्ण शेती सिंचनाखाली आली असती. आधी याच पद्धतीचे सर्व्हेक्षण व नियोजन करण्यात आले होते. परंतु नंतर कुणाच्यातरी दबावात येऊन लोअर वर्धाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हा निर्णय फिरविल्याचे बोलले जात आहे. ज्या भागात १०० फुट जमिनीत खोल खोदून सुद्धा विहिरींना पाणी लागत नाही अश्याच ठिकाणी कालव्याच्या पाण्याचे नियोजन नसल्यामुळे शेतकरी हतबल होत आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांची नियोजनशुन्यता तसेच बेजबाबदारवृत्ती या प्रकारला कारणीभूत आहे. या परिसरातील कास्तकारांनी खा. तडस, आ. कांबळे तसेच विभागाच्या संबंधित मंत्र्यांना निवेदने देवून नवीन कालव्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)