जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यास प्राधान्य द्या
By Admin | Updated: September 19, 2016 00:53 IST2016-09-19T00:53:01+5:302016-09-19T00:53:01+5:30
सर्वसामान्य जनतेला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.

जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यास प्राधान्य द्या
हिंगणीच्या जनता दरबारात पंकज भोयर यांचे आवाहन
सेलू : सर्वसामान्य जनतेला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा कामासाठी हेलपाटे मारावे लागतात; पण समस्या निकाली निघत नाही. स्थानिक पातळीवरची समस्या असताना त्रास होतो. यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन आ.डॉ. पंकज भोयर यांनी केले.
हिंगणी येथे आयोजित जनता दरबार उपक्रमात ते मार्गदर्शन करीत होते. मंचावर सरपंच उज्वला निघडे, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, भाजप तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, उपसरपंच अरुण कौरती, ग्रा.पं. सदस्य माला मुडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, गटविकास अधिकारी सुभाष सडमाके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरीष पासरे, भाजप कार्यकर्त्या कुंता खडगी, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष विलास वरटकर, अशोक मुडे, तालुका कृषी अधिकारी बी.के. वाघमारे, नायब तहसिलदार बी.एन. तिनघसे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. वाडे, मंडळ अधिकारी एस.एस. सायरे आदी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी उपस्थित राहून समस्या मांडल्या. वीज, राशन, निराधार योजना, जातीचे प्रमाणपत्र, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, वर्ग २ ची वर्ग १ मध्ये शेतजमीन करणे आदी समस्येवर चर्चा करण्यात आली. आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या निकाली काढण्याचे आदेश दिले. जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.(तालुका प्रतिनिधी)