रबी हंगामावर वीज तुटीचे सावट

By Admin | Updated: October 15, 2015 02:22 IST2015-10-15T02:22:17+5:302015-10-15T02:22:17+5:30

खरीप हंगाम संपून रबी सुरू होत आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.

Power looms on Rabi season | रबी हंगामावर वीज तुटीचे सावट

रबी हंगामावर वीज तुटीचे सावट

सिंचन प्रभावित : दिवसाला केवळ आठ तास वीजपुरवठा
वर्धा : खरीप हंगाम संपून रबी सुरू होत आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा हंगाम महत्त्वाचा असतो; पण जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवसाला केवळ आठ तास वीज मिळत असल्याचे वास्तव आहे. यामुळे रबीची पेरणी कशी करावी आणि खरीपातील कपाशी कशी जगवावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे.
ओलिताशिवाय दुबार पीक शेतकरी घेऊ शकत नाही. शिवाय खरीपातील पिकेही हमखास हाती यावी, ही अपेक्षाही ओलिताशिवाय शक्य नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सिंचित शेतीकडे वळला आहे. अनेकांनी विहिरी व कुपनलिका खोदल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यातून ओलिताची सोय झाली आहे. या सिंचनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आत्यंतिक आवश्यकता असते ती विजेची!
जिल्ह्यात तीन झोननुसार वीज पुरवठ्याचे वेगवेगळे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. याचा आढावा घेतला असता दिवसाला शेतकऱ्यांना केवळ आठच तास वीज पुरवठा होत असल्याचे वास्तव आहे. यात आठवड्यातून चार दिवस सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ पर्यंतच वीज पुरवठा केला जातो तर उर्वरित तीन दिवस रात्री ११.४५ ते सकाळी ९.४५ या वेळेत वीज पुरवठा केला जातो. त्यातही हा पुरवठा सुरळीत न राहता तो वारंवार खंडित होत असतो. त्याची दुरूस्तीही लवकर होत नाही.
बुधवार हा तर शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’, असाच असतो. या दिवशी बरेचदा ब्रेकडाऊन केले जाते. यामुळे बुधवारी दिवसा वीज पुरवठा होत असतानाही त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. यामुळे पाणी असताना विजेअभावी कपाशी सध्या मान खाली टाकत आहे. खरीपाचीच ही गत तर रबी पिकांचे ओलित कसे करावे आणि पिके कशी जगवावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यामुळे किमान १६ तास वीज पुरवठा देणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)

कपाशीला पाण्याची गरज
कापूस निघणे आता सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी शीतदही आटोपून कापूस वेचायलाही सुरुवात झाली आहे; पण उन्ह चांगलेच तापत असल्याने समाधानकारक उत्पादन हाती येण्यासाठी कपाशीलाही पाणी देणे गरजेचे झाले आहे. शिवाय पिकांना चांगले ओलित होण्यासाठी अखंडित वीज पुरवठा मिळणे गरजेचे आहे; पण दिवसाला आठच तास आणि त्यातही चारच दिवस दिवसा वीज मिळत असल्याने पिके कशी जगवावी आणि उत्पन्नात कशी वाढ करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे.

रबी हंगाम कसा सावरायचा?
रबी हंगाम हा पूर्णत: सिंचनावर अवलंबून असतो. त्यातही उसपिकांचे क्षेत्र जिल्ह्यात काही भागात वाढत आहे. लवकरच गहू, हरभरा, चना आदी पिकांची लागवड केली जाणार आहे. अनेकांनी सोयाबीन सवंगून रबीची तयारीही सुरू केली आहे. पण वीजपुरवठा आज सकाळी तर उद्या रात्री असाच राहिला तर पिके कशी जगवावी हा प्रश्न आहे. रबी पिकांना पाण्याची आत्यंतिक गरज असून आठ तासात पाणी कसे ओलवावे ही चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे.

ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन हवेतच
वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. यात कोरडवाहूसोबतच बागायती शेतकरीही आहेत. त्यामुळे या आत्महत्या कमी व्हाव्या यासाठी महाराष्टाचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना १६ तास वीज मिळेल, असे जाहीर केले होते; पण नेत्यांची आश्वासने ही हवेत विरण्यासाठीच असतात, याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येत आहे. १६ तर नाहीच; पण आठ तास मिळणारी वीजही अखंडित मिळत नाही. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. आत्महत्या थांबविण्याचे त्यांचे प्रयत्नही फसवे असल्याचा आरोपही शेतकऱ्यांतून केला जात आहे.

Web Title: Power looms on Rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.