शेतकरी व नागरिक त्रस्त : नाल्या असमर्थ ठरल्याने ले-आऊटमध्येही पाणीच पाणीतळेगाव (श्या.पं.) : गत दोन-तीन दिवस एकसारखा पाऊस सुरू होता. महामार्गावरील पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी दुतर्फा नाल्या काढल्या आहेत; पण त्या सदोष आहेत. त्यांची टोके मुख्य नालीत काढण्यात आली नाहीत. यामुळे नालीचे पाणी शिरून परिसरातील शेतांना रात्रभरात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. या प्रकारामुळे पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मार्गालगतच्या ले-आऊटमध्येही सर्वत्र पाणी साचले आहे.तळेगाव ते खडका दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. तळेगाव ते गुरूदेव सॉ- मिलपर्यंत ओरिएंटल कंपनीने रस्त्याचे चौपदरीकरण केले तर चिस्तूर ते खडकापर्यंतचे काम आरआयबी कंपनीने केले. महामार्गावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दुतर्फा नाल्या खोदण्यात आल्या. गावालगत भूमिगत नाल्या करण्यात आल्या आहेत. याच नाल्यालगत पुन्हा केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. यामुळे त्या नाल्या बुजल्या आहेत. नाल्या बुजल्याने पावसाचे पाणी थेट लगतच्या शेतात शिरत. शिवाय भूमिगत नाल्यांचे छिद्र बुजल्याने रस्त्यालगतच्या ले-आऊटमध्येही डबके साचले आहे. तळेगाव ते खडका दरम्यान पहिल्याच पावसात अनेक शेतात व ले-आऊटमध्ये पाणी शिरल्याने तळे साचले आहे. ही स्थिती कायम राहिल्यास शेतात पिके घेणे कठीण होणार आहे. मुळात महामार्गाच्या दुतर्फा केबलसाठी नाल्या खोदल्याने पाणी वाहून जाण्याकरिता असलेल्या नाल्या बुजणार नाही, याची काळजी महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांवर बिकट प्रसंग ओढवला आहे. किंबहुना महामार्गाची देखभाल दुरूस्ती करणाऱ्या दोन्ही कंपनीनेही केबलसाठी नाल्या खोदल्या जात असताना दुर्लक्ष केले. यामुळे शेतकऱ्यांवर सध्या ओढवलेल्या बिकट प्रसंगासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत या दोन्ही कंपन्या व केबलसाठी नाल्या खोदणारे कंत्राटदार तेवढेच जबाबदार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)दुतर्फा काढलेल्या नाल्या बुजल्या; भूमिगत नाल्याही ठरताहेत कुचकामीमहामार्गावर पडणारे पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी महामार्गाच्या दुतर्फा नाल्या काढण्यात आल्यात; पण त्या बुजल्या आहेत. यामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. नाल्याची टोके जवळच्या नाल्यामध्ये सोडणे महत्त्वाचे होते; पण तेही करण्यात आलेले नाही. यामुळे महामार्गावरील पावसाचे पाणी लगतच्या शेतात शिरून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे परिसरातील शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. शिवाय ले-आऊटमध्येही पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उपाययोजना गरजेच्यामहामार्गावरील पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात अधिक त्रास होण्याची शक्यता आहे.संततधार पावसामुळे शेतीची कामे रखडलीकारंजा (घा.) : तालुक्यात तीन ते चार दिवस संततधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे अनेकांच्या शेतजमिनी जलमय झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले. पाऊस व विद्युल्लतेमुळे ३३ केव्हीचा वीज पुरवठा खंडित होऊन तालुक्यातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. सतत पाऊस सुरू असल्याने शेतातील कामेही खोळंबली होती. यानंतर दोन दिवस उघाड मिळाली; पण अनेक शेतांमध्ये पाणी असल्याने पेरणीची कामे प्रलंबित राहिलीत.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरण्या आटोपल्या होत्या. या शेतकऱ्यांना तीन दिवस आलेल्या संततधार पावसाचा फटका बसला. पेरलेले बियाणे उगविणार की नाही, अशी शंका शेतकरी उपस्थित करीत आहेत. दुबार पेरणीची वेळ तर येणार नाही ना, अशी शंका होती; पण मंगळवारी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीला प्रथम प्राधान्य दिले आहे. पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामेही रखडली होती.(शहर प्रतिनिधी)
महामार्गाच्या पाण्याने शेताचे झाले तळे
By admin | Updated: June 25, 2015 02:09 IST