कोट्यवधी खर्चूनही नळ योजना कोरडीच
By Admin | Updated: May 1, 2016 02:13 IST2016-05-01T02:13:13+5:302016-05-01T02:13:13+5:30
चार दश्कांपासून पाणी पुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण अद्यापही पुलगाव शहर पाणी पुरवठ्याबाबत कोरडेच आहे.

कोट्यवधी खर्चूनही नळ योजना कोरडीच
पाणी पुरवठ्यासाठी धरणाचा आधार : चार दिवसांआड नळ येणारच्या चर्चेने महिलांचा त्रागा
पुलगाव : चार दश्कांपासून पाणी पुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण अद्यापही पुलगाव शहर पाणी पुरवठ्याबाबत कोरडेच आहे. शहराचा पाणी पुरवठा पुर्णत: धरणातून पाणी सोडण्यावर अवलंबून आहे. शहराला शनिवारी पाणी पुरवठा न झाल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली.
शहराच्या सीमेवरून बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या अप्पर व लोअर वर्धा धरणामुळे नदी रखरखत्या उन्हात कोरडी पडले. पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून शहर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली; पण शहराचा वाढता व्याप, नियमबाह्य नळ जोडण्यास, तांत्रिक दृष्ट्या सदोष असलेल्या जलवाहिन्या यामुळे पाणी पुरवठा योजना दरवर्षी उन्हाळ्यात डोके वर काढते. धरण बांधल्यामुळे नदी कोरडी पडते.
धरणातून पाणी सोडले तर पाणी साठविले जात नाही. यामुळे काही वर्षांपूर्वी २० लाख रुपये खर्चाचा बंधारा नदीवर बांधण्यात आला; पण माती खचल्यामुळे तो बंधाराही पाणीसाठा करण्यात अपयशी ठरला. कायमस्वरूपी योजना म्हणून २०१० मध्ये ९६ कोटी रुपये खर्चाचा पुलगाव बॅरेजचा प्रस्ताव मांडला गेला. मार्च २०१२ पर्यंत त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण कंत्राटदाराची कोट्यवधी रुपयांची देयके न मिळाल्याने बॅरेजचे काम रखडले. यामुळे अद्यापही बॅरेजचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पाणीसाठा नसल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
गत कित्येक वर्षांपासून वर्षभराचे बील भरूनही नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मागील काही दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे. शहरात शनिवारी पाणी पुरवठा न झाल्याने प्रत्येक चवथ्या दिवशी पाणी पुरवठा होणार असल्याची चर्चा सुरू होती. यामुळे शहरात पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई टाळण्यासाठी न.प. ने लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)