अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी घरपट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:37 IST2018-01-31T23:36:04+5:302018-01-31T23:37:36+5:30
जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना मोफत कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांच्याकडे युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे.

अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी घरपट्टे द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना मोफत कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांच्याकडे युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वर्धा जिल्ह्यात पिढ्यानपिढ्या ३० ते ४० हजार कुटुंब अतिक्रमण करून राहतात. मात्र यांना कायमस्वरूपी घरपट्टे नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. अतिक्रमणधारक शासकीय व वनविभागाच्या जागांवर अतिक्रमण करून राहत आहे. अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देणार असे आश्वासन निवडणुकीच्यावेळी दिले होते. या प्रश्नाला घेवूनच २० मार्च रोजी वर्धा येथून मुख्यमंत्री यांच्या सचिवालयावर भूदेव यात्रा (पदयात्रा) काढण्यात येणार आहे. १० हजार कुटुंबांना ८५ कि़मी. यात्रा काढण्याची वेळ येवू नये याकरिता शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली. या आंदोलनात सिंदी (मेघे), सावंगी, बोरगाव, म्हसाळा, नालवाडी, रिधोरा, अंतरगाव, भानखेडा, दहेगाव (गो.), पालोती, हमदापूर, दिग्रज, मांडवा, सुकळी (बाई), मदनी, गणेशपूर, पांढरकवडा, हेलोडी, बेलोडी, पुजई, परसोडी, देऊळगाव, सोनेगाव (स्टे.), पडेगाव, सेलसूरा, आलोडी, वायगाव (नि.), कुरझडी, येळाकेळी, केळझर, नादगाव (पे.), खरांगणा (मो.), नागापूर, भूगाव आदी गावातील नागरिक सहभागी होणार आहे.