पैसेवारी म्हणते, जिल्ह्यात सुकाळ

By Admin | Updated: October 17, 2015 02:49 IST2015-10-17T02:49:41+5:302015-10-17T02:49:41+5:30

जाहीर झालेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील एकाही गावात दुष्काळ नसल्याचे समोर आले आहे.

Paywali says, it is a pleasant place in the district | पैसेवारी म्हणते, जिल्ह्यात सुकाळ

पैसेवारी म्हणते, जिल्ह्यात सुकाळ

नजरअंदाज पैसेवारी जाहीर : सोयाबीन गेले, कपाशीचे उत्पन्न घटण्याची चिन्हे
वर्धा: जाहीर झालेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील एकाही गावात दुष्काळ नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६५ असल्याचे दर्शविण्यात आले आहे. वास्तवात चित्र मात्र उलट आहे. शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षेनुसार कोणतेही उत्पन्न येण्याची शाश्वती नाही. नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या सुधारीत पैसेवारीत तरी हे चित्र पालटेल, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न निघण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या तोंडावर काढण्यात येत असलेल्या सोयाबीनने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळविल्या. एकरी एक ते दीड पोते उतारी मिळाल्याने लागवडीकरिता लागलेला खर्चही निघताना दिसत नाही. उशिरा पाऊस आल्याने पेरण्या लांबल्या. अशात पुन्हा पावसाने दडी मारली. यामुळे सोयाबीनची वाढ खुंटली. दरम्यान, पिके मरणासन्न अवस्थेत असताना पाऊस आला. यामुळे पिके वाचली; मात्र पुन्हा मारलेल्या दडीमुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. परिणामी नगदी पीक असलेल्या सोयाबीनने ऐनवेळी शेतकऱ्यांना दगा दिला.
अशीच अवस्था कपाशीची झाली आहे. कपाशी पात्यांवर असताना आलेल्या पावसामुळे पात्या गळाल्या. यानंतर पुन्हा पाऊस आला नाही. यामुळे गत महिन्यात आलेला पाऊस कपाशीकरिता तारक ठरणार असे म्हणताना तो मारक ठरला. आज कपाशीची अवस्था बिकट आहे. जमिनीतील उष्णतेमुळे झाडे करपत आहेत. सोबतीला विविध रोगांचा प्रादुर्भाव आहेतच. यामुळे कपाशीकडूनही शेतकऱ्यांना आता विशेष आशा राहिल्या नाहीत. असे असताना जिल्ह्यात ५० च्या वर निघालेली पैसेवारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी अशीच आहे. यावर मार्ग काढण्याकरिता जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग राबविण्याची मागणी काही शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे. यात जर जिल्ह्याची पैसेवारी ५० च्या आत आली तर शेतकऱ्यांना मदत मिळणे सोपे होईल. यामुळे सुधारीत पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस तरीही जमिनी कोरड्याच
जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जलसाठे भरले असले तरी जमिनीची धूप शांत झाली नाही. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पामध्ये विक्रमी जलसाठा निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तरी शेतीचा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात ६६.६४ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद गत वर्षीच्या तुलनेत १० टक्के अधिक झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा पाऊस अधिक असला तरी तो पिकांकरिता लाभदायक नसल्याने दिसून आले आहे. या पावसामुळे जमिनची धूप शांत झाली नसल्याने उष्णतेमुळे पिकांची स्थिती दयनिय झाली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने तापमाणामुळे पीक करपत असल्याचे चित्र आहे.
सोयाबीनला एकरी दीड पोत्यांचा उतारा
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात मध्यंतरी सोयाबीनची स्थिती पाहून चांगले उत्पन्न होईल, असे वाटत होते. पीक पाहून शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र मध्यंतरी पावसाने मारलेल्या दडीमुळे शेंगा भरल्या नसल्याने उत्पन्न हातचे गेल्याचे दिसून आले आहे.
अशीच अवस्था कपाशीची आहे. कपाशीचे पिकही हातेचे जाण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात अशी स्थिती असताना शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यात नुकसान नसल्याचे दाखविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Paywali says, it is a pleasant place in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.