साईनगरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक
By Admin | Updated: August 9, 2014 23:51 IST2014-08-09T23:51:39+5:302014-08-09T23:51:39+5:30
साईनगर परिसरात रात्री झालेल्या कृत्रिम भारनियमनामुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या पावडे नर्सिंग होम चौकात असलेल्या कार्यालयातवर हल्ला चढविला. या कार्यालयात कोणीच कर्मचारी हजर नव्हते.

साईनगरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक
वर्धा : साईनगर परिसरात रात्री झालेल्या कृत्रिम भारनियमनामुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या पावडे नर्सिंग होम चौकात असलेल्या कार्यालयातवर हल्ला चढविला. या कार्यालयात कोणीच कर्मचारी हजर नव्हते. अखेर येथील अभियंता व कर्मचारी दुरूस्ती करीत असल्याची माहिती मिळाली असता नागरिकांनी तिकडे आपला मोर्चा वळविला. यात अभियंत्यासह कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. यावेळी कंपनीच्या वाहनाचीही तोडफोडही करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.
वेळीअवेळी होत असलेल्या भारनियमनामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच वैतागले आहेत. अशात पावसाच्या दडीने वातवरणात आर्द्रता वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. या परिस्थितीचा वीज गुल झाल्याने त्रास अधिक होत आहे. यातच शुक्रवारी रात्री साईनगर परिसरात वीज गेल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येत वीज वितरणच्या कार्यालयावर हल्ला चढविला. यात त्यांना इथे कोणीही नसल्याचे दिसल्याने ते परत जात असताना श्री निवास कॉलनी येथे दुरूस्तीच्या कामाकरिता जात असलेल्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून त्यांना शिवीगाळ केली. यात कर्मचारी विष्णू ठाकरे हे जखमी झाले. ठाकरे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात रवी दुपारे यांच्यासह सात ते आठ व्यक्तीविरूद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, ३४१, ३५३, ३३७, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)