आवडता प्रवास महागल्याने प्रवासी नाराज
By Admin | Updated: June 14, 2014 23:47 IST2014-06-14T23:47:53+5:302014-06-14T23:47:53+5:30
उन्हाळ्यात बहुतेक जण बाहेरगावी फिरायला जाण्याचा किंवा देवदर्शनासाठी जाण्याचा बेत आखतात. यात वयोवृद्धांचा समावेश जास्त असून सवलत मिळत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या ‘आवडेल तिथे प्रवास’ या

आवडता प्रवास महागल्याने प्रवासी नाराज
वर्धा : उन्हाळ्यात बहुतेक जण बाहेरगावी फिरायला जाण्याचा किंवा देवदर्शनासाठी जाण्याचा बेत आखतात. यात वयोवृद्धांचा समावेश जास्त असून सवलत मिळत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या ‘आवडेल तिथे प्रवास’ या योजनेचा जास्त लाभ घेतल्या जातो. पण यंदा या योजनेच्या दरातही जूनपासून वाढ झाल्याने प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
यंदा मागील दरांपेक्षा जवळपास १० ते १५ टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे आवडीचा प्रवास खिशाला आता परवडणारा झाल्याचे प्रवासी वर्गातून बोलल्या जात आहे. परिणामी, पर्यटन किंवा देवस्थानची परिक्रमादेखील आता महागात पडणार असे बोलल्या जात आहे.
कायम तोट्यात असल्याचा शिक्का राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. तोट्याच्या नावाखाली परिवहन महामंडळाकडून सातत्याने दरात वाढ केली जाते. अलीकडच्या तीन वर्षात जवळपास दुपटीने सर्वच भाड्यात वाढ झाली. नियमित अंतराने ही वाढ सुरूच असताना पुन्हा प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली. त्यामुळे ‘आवडेल तिथे प्रवास’ प्रत्येकाला चांगलाच महागात पडणार आहे. आगाराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एसटीचा वर्धापनदिन साजरा करताना हळूच राज्य परिवहन महामंडळाने दरात वाढ केली. परिणामी, ४ दिवसांच्या प्रवासासाठी ६५० रूपयांवरून आता ८०० रूपये मोजावे लागतात, पण कमी गर्दीच्या कालावधीत ४ दिवसांसाठी प्रौढांसाठी ७४० तर मुलांसाठी ३७० रूपये मोजावे लागतात.
प्रामुख्याने वर्षाची विभागणी दोन गटांत केली असून, १५ आॅक्टोबरपासून ते १४ जूनपर्यंत गर्दीच्या कालावधीत तिकिटांचे वाढीव दर राहणार आहेत. उलट कमी गर्दीच्या १५ जूनपासून ते १४ आॅक्टोंबरपर्यंत तिकिटांत थोडासा दिलासा मिळाला. दुसरीकडे ७ दिवसांच्या प्रवासासाठी प्रौढांना साध्या बससाठी १ हजार ४०० तर मुलांसाठी ७०० रूपये भरून प्रवास करता येणार आहे. निमआराम बससाठी प्रौढांना १ हजार ६०५ तर मुलांसाठी ८०५ रूपये ७ दिवसांच्या प्रवासासाठी भरावे लागतात. सात दिवसांच्या आंतरराज्यीय प्रवासासाठी १ हजार ७३० तर मुलांसाठी ८६५ रूपये भरून प्रवास करता येणार आहे.
गर्दीच्या कालावधीसाठी या तिकिटांच्या दरांपेक्षा कमी गर्दीच्या हंगामात आगाराने थोडासा दिलासा दिला. इतर वाहतुकीच्या तुलनेत एसटीचे भाढे वाढत राहिल्याने प्रवाशांना बसचा प्रवास डोईजड होत असल्याचे चित्र दिसत आहे.(शहर प्रतिनिधी)