झोपलेल्या शासनाचे पॅकेजही फसवे
By Admin | Updated: December 19, 2015 02:08 IST2015-12-19T02:08:07+5:302015-12-19T02:08:07+5:30
देशातील सगळ्यात मोठ्या मुंबईच्या बाजार समितीचा मी सभापती होतो. आमची २०० कोटींची ठेव असली तरीही हिंगणघाट बाजार समिती सारख्या योजना राबविण्याची बुद्धी आम्हाला सुचली नाही.

झोपलेल्या शासनाचे पॅकेजही फसवे
शशिकांत शिंदे : १३२ विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण
हिंगणघाट : देशातील सगळ्यात मोठ्या मुंबईच्या बाजार समितीचा मी सभापती होतो. आमची २०० कोटींची ठेव असली तरीही हिंगणघाट बाजार समिती सारख्या योजना राबविण्याची बुद्धी आम्हाला सुचली नाही. त्यामुळे अॅड. कोठारी यांच्या कल्पकतेचा गौरव केला पाहिजे, असे गौरवोद्गार काढतानाच विदर्भातील मुख्यमंत्री अद्याप विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. झोपलेल्या भाजपा सरकारने पॅकेजही फसवे असल्याचा आरोप मुंबई कृउबासचे माजी सभापती आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. अद्याप कापसाला वाढीव हमीभाव जाहीर का केला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
तालुक्यातील वडनेर येथे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे गुरुवारी १७ डिसेंबर रोजी विविध उपक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. शिंदे बोलत होते. यावेळी मंचावर आमदार जगजितसिंग पद्मसिंग पाटील, हिंगणघाट कृऊबासचे सभापती अॅड. सुधिर कोठारी, आर्वीचे सहकार नेते दिलीप काळे, आर्वी बाजार समितीचे सभापती संदीप काळे, संजय तपासे, नंदा साबळे, हिंमत चतूर, अशोक वांदीले, संजय कामनापुरे, प्रा. येरलेकर, उत्तम भोयर, मधुसूदन हरणे, दिनकर घोरपडे, उपसभापती हरीश वडतकर, नरेंद्र थोरात आदींची उपस्थिती होती.
आ. जगजितसिंग पद्मसिंग पाटील म्हणाले, शासन देखील शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या योजना राबवू शकत नाही, त्या योजना हिंगणघाट बाजार समिती राबवित आहे. असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले. त्यामुळे राज्य शासनाच्या कार्यपद्धतीवर टीका करीत सगळ्यांनी एकत्रित येऊन संघर्ष करण्याची वेळ आल्याचे पाटील म्हणाले. या विविध उपक्रम सोहळ्यात अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या १३२ विद्यार्थ्यांना लॅपटॉप चे वाटप करण्यात आले. तसेच वडनेर-टेंभा या पांदण रस्त्याच्या कामालाही प्रारंभ करण्यात आला. बालिका बचाव योजनेंतर्गत धनादेश वितरण, ठिबक सिंचन योजना अनुदानाचे धनादेश वितरण व शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरणही यावेळी करण्यात आले. सोहळ्याला परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. संचालन ओम डालीया यांनी केले. उपस्थितांचे आभार सरपंच विनोद वानखेडे यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)