वर्षभरापासून कार्यभार प्रभारावरच
By Admin | Updated: May 25, 2015 02:07 IST2015-05-25T02:07:21+5:302015-05-25T02:07:21+5:30
महावितरणच्या वर्धा उपविभागांतर्गत येणाऱ्या येळीकेळी येथील कनिष्ठ अभियंत्याची बदली होवून वर्ष होत आहे.

वर्षभरापासून कार्यभार प्रभारावरच
आकोली : महावितरणच्या वर्धा उपविभागांतर्गत येणाऱ्या येळीकेळी येथील कनिष्ठ अभियंत्याची बदली होवून वर्ष होत आहे. पण अद्यापही कनिष्ठ अभियंत्याची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे महावितरणाचा गाडा प्रभारावर हाकणे सुरू आहे. शिवाय लाईनमन व मदतनीसांचा सुद्धा अनुशेष असल्यामुळे प्रभारीला तारेवर कसरत करावी लागत आहे.
महाविरणच्या येळीकेळी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १४ गावे येतात. परिसरातील गावात बागायतदार शेतकऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. असे असताना महावितरणे कनिष्ठ अभियंत्याचे पद वर्षभरापासून रिक्तच ठेवले. येथील प्रभार आंजी एकचे राजुरकर व आंजी दोनचे जयपूरकर यांना एक-एक महिन्यासाठी देण्यात येतो. आंजी १ व २ चे कार्यक्षेत्र सुद्धा मोठे आहे. शिवाय तेथील शेतकरी संवेदनशील आहे. त्यामुळे दोन ठिकाणचा गाडा हाकताना प्रभारींना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. येळीकेळी कार्यालयात लाईनमनचा सुद्धा मोठा अनुशेष आहे. १४ गावांचा डोलारा सांभाळायला अवधे सहा कर्मचारी आहे. त्यांना रात्र-रात्र जागून बिघाड निर्माण झाल्यास दुरुस्तीची कामे करावी लागतात. येथील काहीची बदली झाली तर काही लाईनमन सेवानिवृत्त झाले पण लाईनमनच्या रिक्त जागा भरण्यात आल्या नाही. महिन्यापूर्वी आकोलीचे लाईनमन चौधरी सेवानिवृत्त झाले पण त्यांच्या जागी अद्याप नव्याने कुणाची नियुक्ती करण्यात आली नाही. अशावेळी नागरिकांना आपली गाऱ्हानी, तक्रार कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंत्यालाच सांगावी लागते. त्यामुळे घरगुती व कृषी पंपाची वीज जोडणीची कामे प्रभावित झाली आहे. किरकोळ व गंभीर स्वरूपाचा विजेत बिघाड झाल्यास अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार येतो.(वार्ताहर)