संघटनात्मक महिला शक्तीच दारूबंदी करू शकते
By Admin | Updated: February 24, 2016 02:12 IST2016-02-24T02:12:47+5:302016-02-24T02:12:47+5:30
श्रमिक एल्गार संघटना चंद्रपुरात गत १५ वर्षांपासून दारूबंदीवर काम करीत आहे. दारूने कुटुंबाची पर्यायाने राष्ट्राची मोठी हानी होत आहे.

संघटनात्मक महिला शक्तीच दारूबंदी करू शकते
पारोमिता गोस्वामी : सेवाग्राम आश्रमात कस्तुरबा गांधी पुण्यतिथी कार्यक्रम
सेवाग्राम : श्रमिक एल्गार संघटना चंद्रपुरात गत १५ वर्षांपासून दारूबंदीवर काम करीत आहे. दारूने कुटुंबाची पर्यायाने राष्ट्राची मोठी हानी होत आहे. शासनाचे महसूल धोरण या बंदीला कारणीभूत ठरत आहे. दारू हा विषयच ज्वलंत समस्या निर्माण करणारा असल्याने यावर संपूर्ण बंदी शिवाय पर्याय नाही. चंद्रपूरमध्ये दारूबंदीचे जे यश मिळाले आहे, ते संघटनात्मक महिला शक्तीमुळे दारूबंदी होऊ शकली, असे विचार चंद्रपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केले.
आश्रम परिसरात कस्तुरबा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमधाम आश्रमचे गौतम बजाज तर अतिथी म्हणून आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सर्व सेवासंघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, राजस्थान सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्ष आशा बोथरा व उषा पंडित यांची उपस्थिती होती.
गोस्वामी म्हणाल्या, दारूबंदी ही समाजातील महत्त्वपूर्ण समस्या असली तरी या बाबत शासन हे फारसे अनुकूल नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील २५ हजार महिला एकत्र येवून मतदानाच्या वेळेस आपल्या घरांवरा दारूबंदी होईल तरच मत मागावे अशा आशेचे वाक्य त्यांनी लिहले होते. विदर्भामध्ये तीन जिल्ह्यात दारूबंदी असली तरी गडचिरोली व वर्धामध्ये मात्र जे नियम लागू केलेले नाही ते चंद्रपूरमध्ये लागू केलेले आहे. आज कुठल्याही कामाकरिता महिलांच्या संघटनात्मक शक्तीशिवाय पर्याय नाही. समाज व राष्ट्राच्या हितासाठी महिला शक्तीचा उपयोग करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. वर्धेंतील दारूबंदी अस्तित्वात आणण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम बजाज यांनी बाच्या अंतिम दिवसाचा प्रसंग सांगून बा आगाखान पॅलेसमध्ये आजारी होत्या. आजार बरा होण्याची शक्यता दिसत नव्हती. बा सतत ईश्वराचे आणि बापूचे स्मरण करत होत्या. तुम्ही आराम करा. थकून जाल असा सल्ला निकटवर्तीयांनी दिला. पण या दोघांचे स्मरण मला शक्ती देणारे आणि न थकविणारे असे आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशांत गुजर यांच्या ‘जय जगत जय जगत’ या गिताने झाली. प्रास्ताविक जयवंत मठकर योनी केले. संचालन सर्व सेवा संघमंत्री शोभा शिराढोणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मंत्री प्रा.श्रीराम जाधव यांनी मानले.
प्रभू सुनलो हमारी प्रार्थना या गीताने समारोप झाला.
याप्रसंगी अॅड. मा.म. गडकरी, डॉ. उल्हास जाजू, नत्थुजी चव्हाण, अधीक्षक भावेश चव्हाण, बाबाराव खैरकार, सिध्देश्वर उमरकर, आकाश लोखंडे, प्रशांता ताकसांडे, नई तालीम व आश्रमचे कार्यकर्ता आनंद निकेतन विद्यालयाचे विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.(वार्ताहर)