वक्तृत्व स्पर्धेत घडला ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’चा जागर

By Admin | Updated: January 12, 2016 02:04 IST2016-01-12T02:04:37+5:302016-01-12T02:04:37+5:30

स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वर्धाच्या वतीने जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे घेण्यात आली.

Oratory Competition happened in the 'Cleanliness from the Cleanliness' to the Jagar | वक्तृत्व स्पर्धेत घडला ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’चा जागर

वक्तृत्व स्पर्धेत घडला ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’चा जागर

स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा : जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशनचा उपक्रम
वर्धा : स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वर्धाच्या वतीने जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे घेण्यात आली. यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयीन गटामधून सागर कुबेटकर तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटामधून रश्मी खडीकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हे दोन्ही स्पर्धक राज्यस्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) विवेक ईलमे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे तर प्रमुख अतिथी म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, नाट्य दिग्दर्शक हरिष इथापे, पंकज वंजारे, रत्नाकर सिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.
पाणी गुणवत्ता व परिसर स्वच्छता या विषयामध्ये युवा वर्गाला सहभागी करून घेण्यासाठी व स्वच्छतेची व्याप्ती वाढवून युवा वर्गामध्ये पाणी गुणवत्ता व स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करून प्रत्येक महाविद्यालयामधून संदेश वाहक व अभ्यासू वक्ते तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यासाठी दरवर्षी शासनामार्फत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
जिल्ह्यात पाणी गुणवत्ता व स्वच्छतेबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम स्वच्छ भारत मिशनच्या वतीने राबविण्यात येतात. ही स्पर्धा सदर उपक्रमाचाच एक भाग आहे. महिन्याभरात तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामधील दोन्ही गटामधून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे स्पर्धक जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरले. जिल्हास्तरावरून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना साधन व्यक्ती म्हणून मान्यता आहे. स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रम या कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार व क्षमता बांधणी यासारख्या उपक्रमामध्ये प्राधान्याने त्यांना साधन व्यक्ती म्हणून आमंत्रित करणार आहे.
अत्ंयत चुरशीच्या झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी स्वच्छ निर्मल शाळा, बालकास लावी लळा, शुद्ध थेंब पाण्याचा लाभ आरोग्यदायी जीवनाचा, कचरा नव्हे कांचन, करा घनकचऱ्याचे व्यवस्थापन, मिळून साऱ्या जनी मिळवू स्वच्छ व शुद्ध पाणी, तरूणाईचे नवे धडे स्वच्छतेतून समृद्धीकडे, करू सांडपाण्याचे व्यवस्थापन धरतीचे होईल नंदनवन, करू तपासणी पाण्याची हमी आरोग्याची जीवनाची, यासह इतरही अनेक विषयावर स्पर्धकांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. स्पर्धेचे परीक्षण वंजारे, इथापे व रत्नाकर सिरसाट यांनी केले. संचालन माहिती, शिक्षण संवाद तज्ज्ञ विनोद खोब्रागडे यांनी केले. आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन सचिन खाडे व शालेय स्वच्छता तज्ज्ञ कैलास बाळबुधे यांनी मानले. स्पर्धेला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी तज्ज्ञ कर्मचारी आणि यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
वरिष्ठ महाविद्यालयीन गटात द्वितीय क्रमांक शगुप्ता अ. हसन, तर तृतीय क्रमांक वृषाली वाघमारे व राणी भांगे यांना विभागून देण्यात आला. तसेच कनिष्ठ महाविद्यालय गटात द्वितीय क्रमांक चंचल वाधवान व प्रगती पिसुड्डे यांना तर तृतीय क्रमांक किरण कापडे व मोहन गाखरे या चौघांना विभागून देण्यात आला.(शहर प्रतिनिधी)

वरिष्ठ गटातून सागर कुबेटकर तर कनिष्ठ गटातून रश्मी खडीकर अव्वल
युवकांमध्ये स्वच्छता आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन याबाबत जागृती वाढावी, त्यांनी स्वत: स्वच्छतेचा संदेश समाजात प्रषित करावा यासाठी म्हणून स्वच्छ भारत मोशन अंतर्गत हा स्पर्धात्मक उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून चांगले वक्तृत्वपटू तयार होत आहेत.

Web Title: Oratory Competition happened in the 'Cleanliness from the Cleanliness' to the Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.