दारूचे व्यसन थांबविल्यावरच राष्ट्रीय विकास शक्य
By Admin | Updated: June 14, 2014 23:48 IST2014-06-14T23:48:17+5:302014-06-14T23:48:17+5:30
दारू पिणाऱ्या शंभरातून किमान दहा व्यक्ती रोज दारूचे व्यसन करतात. त्यामुळे श्रम, वेळ, पैसा वाया जातो. मात्र त्याला त्याचे काहीही वाटत नाही. म्हणूनच दारूचे व्यसन हा आपल्या देशातील सर्वात गंभीर आजार

दारूचे व्यसन थांबविल्यावरच राष्ट्रीय विकास शक्य
जनजागरण मोहिमेचा दुसरा टप्पा : अंनिसचा उपक्रम
वर्धा : दारू पिणाऱ्या शंभरातून किमान दहा व्यक्ती रोज दारूचे व्यसन करतात. त्यामुळे श्रम, वेळ, पैसा वाया जातो. मात्र त्याला त्याचे काहीही वाटत नाही. म्हणूनच दारूचे व्यसन हा आपल्या देशातील सर्वात गंभीर आजार असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी व्यक्त केले.
आंजी येथील विठ्ठल मंदीरात मार्गदर्शन करताना सुरकार बोलत होते. चेतना विकास या सामाजिक संस्थेतर्फे दारूच्या गंभीर परिणामामुळे होणारे कौटूंबिक वाद, मारहाण, अपघात, घटस्फोट आदींच्या प्रबोधनाकरिता संस्थेच्या मैत्री केंद्र व समाधान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. यांतर्गत हिंगणघाट तालुक्यातील कोरा, आष्टी तालुक्यातील माणिकनगर, वर्धा तालुक्यातील आंजी मोठी येथे महिलांसाठी जनजागरण मेळावे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रसंगी मंचावर व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक दादाराव मुन, बचतगटाच्या अध्यक्षा प्रभा बावणकर, चेतना विकासचे संचालक मुरलीधर मोरे, शिबिर प्रमुख वर्षा ठाकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरकार दारूमुळे होत असलेल्या अपायावर मार्गदर्शन करताना म्हणाले, दारू एकही चांगली गोष्ट होवू देत नाही. शारीरिक, मानसिक, नैतिक पातळीवर दारू व्यक्तीला उद्ध्वस्त करते. दारू पिणारा संशयी होतो. त्यांना भ्रम होवू लागतात. तो खोटा बोलतो, घरातून पैसे चोरण्यापासून घरातील लोकांना मारझोड करतो. प्रसंगी आत्महत्या करतो किंवा दुसऱ्याची हत्या करतो. म्हणूनच दारूचे व्यसन हा कौटूंबिक, सामाजिक व राष्ट्रीय आजार आहे. त्याला थांबविणे म्हणजे राष्ट्राचा विकास होय असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दारूचे व्यसन असलेल्या पुरुषाच्या पत्नीला दिव्यातून जावे लागते. त्यामुळे तिला काही प्राथमिक उपचार माहिती असने आवश्यक असते. त्यामुळे दादाराव मुन यांनीही औषध व प्रथमोपचाराची माहिती दिली.
यावेळी माणिकनगर येथील मेळाव्यास सरपंच काशिनाथ धुर्वे तर कोरा येथे ग्रामपंचायत सदस्या संगिता तामगाडगे, महिला मंडळाच्या अध्यक्ष कुसुम झोडपे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सोबतच आसपासच्या अनेक गावातील महिला या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संचालन मनीषा यादलकर यांनी केले. आभार विमल पांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्ज्वला वैद्य, छाया महल्ले, विना नाखले, शिला तामसे, लिला सुटे, संध्या सातपुते, शारदा बोरकुटे यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)