अतवृष्टी; शेतकर्यांना अनुदानाची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 24, 2014 23:52 IST2014-05-24T23:52:27+5:302014-05-24T23:52:27+5:30
संपूर्ण विदर्भात झालेल्या अतवृष्टीमध्ये येथील भोलेश्वरी नदीला आलेल्या पुराने काठावरील दीडशे शेतकर्यांची हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शासनाने अशा शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत

अतवृष्टी; शेतकर्यांना अनुदानाची प्रतीक्षा
रोहणा : संपूर्ण विदर्भात झालेल्या अतवृष्टीमध्ये येथील भोलेश्वरी नदीला आलेल्या पुराने काठावरील दीडशे शेतकर्यांची हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शासनाने अशा शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती; पण सर्व्हे झाल्यापासून आजपर्यंत हे अनुदान शेतकर्यांना मिळाले नाही. यामुळे सदर अनुदानाची आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न पिडीत शेतकरी उपस्थित करीत आहेत. १२ जुलै २0१३ रोजी संपूर्ण विदर्भात अतवृष्टी झाली. यात भोलेश्वरी नदीला पूर आला. यामुळे रोहण्यातील अनेक घरांत पाणी शिरले. यात मोठय़ा प्रमाणात वित्त हानी झाली. नदी काठावरील हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शेतात रेती व गोटे येऊन पडलेत. शेतातील पिके, कुंपण, ठिबक सिंचन साहित्य, स्प्रिंकलर संच वाहून गेलेत. शासनाने या नुकसानीचा सर्व्हे केला. त्यावेळी शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी २५ हजारापर्यंत मदत देण्याचे जाहीर केले. आता १0 महिन्यांचा काळ लोटला. अतवृष्टीबाबतच्या इतर नुकसानीचे अनुदान अनेकांना मिळाले; पण अद्याप परिसरातील ज्या १00 ते १५0 शेतकर्यांची जमीन खरडून गेली, त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही. यामुळे शासन आपला शब्द पाळणार की, आता पिडीतांना वार्यावर सोडून देणार, याबाबत शंका कुशंका निर्माण होत आहे. शासनाने सदर अनुदान त्वरित शेतकर्यांना वितरित करून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)