निर्मल भारत अभियान शहरांपासून दूरच
By Admin | Updated: September 7, 2014 00:05 IST2014-09-07T00:05:14+5:302014-09-07T00:05:14+5:30
शासनाने गावे सुंदर व निर्मल करण्याकरिता निर्मलग्राम अभियान राबविले़ यास केंद्रस्तरावर निर्मल भारत अभियान नाव देण्यात आल्याने शहरांचाही त्यात समावेश होता; पण हे अभियान शहरात कधी

निर्मल भारत अभियान शहरांपासून दूरच
वर्धा : शासनाने गावे सुंदर व निर्मल करण्याकरिता निर्मलग्राम अभियान राबविले़ यास केंद्रस्तरावर निर्मल भारत अभियान नाव देण्यात आल्याने शहरांचाही त्यात समावेश होता; पण हे अभियान शहरात कधी आलेच नाही़ यामुळे जिल्ह्यातील सर्वच शहरे या अभियानापासून कोसोदूर आहे़ अनेक शहरांत उघड्यावरच शौचविधी उरकला जात असल्याने अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
वर्धा शहरातील आर्वी नाका परिसरातील दयालकृष्ण मार्केटच्या बाजूला लाडे यांच्या खाली जागेसमोर मुख्य रस्त्यावर दिवसरात्र हागणदारी सुरू असते. येथे कचऱ्याचा ढिगारा पडलेला असतो. या प्रकारामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ या ठिकाणी सतत वराहांचा सुळसुळाट असतो. परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे़ या भागातील नागरिक व व्यावसायिक घाण, दुर्गंधी व उघड्यावर उरकण्यात येणाऱ्या शौचविधीमुळे त्रस्त झाले आहेत़ पादचारी येथून नाक मुठीत धरून आवागमन करतात. या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक व व्यावसायिय यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास व अन्य विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. कधीही साथीच्या आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ पालिका प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही होत आहे़
वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. देश, विदेशातील पर्यटक या शहराला भेट देतात़ महात्मा गांधी व विनोबांच्या या पावन भूमीत अस्वच्छता, झोपडपट्टीतील नागरिक उघड्यावर शौचविधी उरकत असेल तर ती लांच्छणात्मक बाब म्हणावी लागेल़ हा प्रकार केवळ वर्धा शहरातच नव्हे तर पुलगाव, आर्वी, देवळी, सिंदी (रेल्वे) यासह अन्य शहरांतही दिसतो़ स्थानिक व जिल्हा प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा परिसर हागणदारीमुक्त करण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)