निंबोली (शेंडे) पुनर्वसनचा तिढा सुटला

By Admin | Updated: May 4, 2016 03:11 IST2016-05-04T03:11:31+5:302016-05-04T03:11:31+5:30

निम्न वर्धा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत होता. यामुळे धरणात

Nimboli (rooftops) rehabilitation was delayed | निंबोली (शेंडे) पुनर्वसनचा तिढा सुटला

निंबोली (शेंडे) पुनर्वसनचा तिढा सुटला

१५ वर्षांच्या लढ्याला यश : २४.०३ हेक्टर जमिनीचा ताबा घेतला
आर्वी : निम्न वर्धा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत होता. यामुळे धरणात जमिनी गेलेल्या निंबोली (शेंडे) येथील गावकऱ्यांना हालअपेष्टा सहन करीत जीवन जगावे लागत होते. यावर तब्बल १५ वर्षांनी न्याय मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या एका विशेष आदेशान्वये २४.०३ हेक्टर आर जमिनीचा ताबा मंगळवारी महसूल विभागाने पुनर्वसन विभागाला दिला. या जागेवर पुनर्वसितांची घरे उभारण्यात येणार आहेत.
जमिनीचा ताबा तहसीलदार, महसूल अधिकाऱ्यांकडून पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात घेतला. या जागेकरिता येथील १५ शेतकऱ्यांनी न्यायालयात विरोध याचिका दाखल केली होती. यात न्यायालयाने पुनर्वसनातील शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्याने जमिनीच्या हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. हस्तांतरणाची कारवाई मंगळवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत सुरू होती. अनुचित प्रकार टाळण्याकरिता पोलीस बंदोबस्त होता. यावेळी तहसीलदार बाळासाहेब मस्के, नायब तहसीलदार मिलिंद जोशी, मंडळ अधिकारी रणजित देशमुख, बी.एच. पांडे, तलाठी जुगनाके, पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता रब्बेवार, एन.बी. नेहारे, ठाणेदार शैलेश साळवी, संदीप हिवाळे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी उपस्थित होता.(तालुका प्रतिनिधी)

१५ शेतकऱ्यांनी केला होता जमीन देण्यास विरोध
४आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) या गावच्या नवीन गावठाण पुनर्वसनासाठी आर्वी देऊरवाडा मौजा दौलतपूर येथील १५ शेतकऱ्यांची ६० एकर म्हणजेच २४.०३ हेक्टर जमीन ताब्यात घेण्याचे प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले होते. परंतु या विरोधात १५ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते; परंतु यात न्यायालयाने नव्याने आदेश निर्गमित केले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या एका विशेष आदेशान्वये सदर भूखंडाची जमीन महसूल विभागाने पुनर्वसन विभागाला पंचसमक्ष हस्तांतरीत केली.

न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी मौजा दौलतपूर येथील २४.०३ हेक्टरचा ताबा घेण्याचे आदेश दिले होते. त्यावरून या जमिनीचा ताबा व हस्तांतरण संबंधीत पुनर्वसन विभागाला करण्यात आले.
- बाळासाहेब मस्के, तहसीलदार, आर्वी.

Web Title: Nimboli (rooftops) rehabilitation was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.