स्वस्त धान्य दुकानात गैरकारभार

By Admin | Updated: June 11, 2014 00:14 IST2014-06-11T00:14:49+5:302014-06-11T00:14:49+5:30

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील गैरकारभाराची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी. तसेच यात दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

Neglect in cheap grains shops | स्वस्त धान्य दुकानात गैरकारभार

स्वस्त धान्य दुकानात गैरकारभार

सेलू : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील गैरकारभाराची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी. तसेच यात दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
प्रत्यक्ष दुकानदाराकडून होणारी मालाची उचल आणि ग्रामस्थांना होणारा पुरवठा पाहता तालुक्यात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गैरप्रकाराला उधाण आले आहे. याला काही अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्याचे बोलले जाते. मागील अनेक दिवसांपासून हा सगळा गैरकारभार येथे सुरू आहे. काही दुकानदार कारवाई अभावी अधिकारी आमच्या पाठीशी आहे, त्यांना देणी द्यावी लागते, त्यामुळे आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही, अशाप्रकारची बतावणी ग्राहकांना करीत आहे. या स्वस्त धान्य दुकानाबाबत माहवारी मालाचा पुरवठा नागरिकांना होत नसल्याने आणि सगळे नियम धाब्यावर बसवून येथे हा कारभार राजरोसपणे सुरू असल्याने अनेक गावातील ग्रामस्थ मिळणाऱ्या सोई-सवलतींपासून वंचित झाले.
स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांची होणारी फरपट पाहता कारवाई गरजेची झाली आहे. मात्र त्याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. स्वस्त धान्य दुकानदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये होत असलेल्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे येथे हे प्रकरण या स्तरावर दडपण्याचा प्रयत्न होत आहे. अन्नसुरक्षा योजनेही येथे बराच घोळ असून गरिबांना यातून वगळण्यात आले आहे. काही श्रीमंताची नावे या यादीत असल्याने ते याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. एपीएल ग्राहकांना तीन महिन्यांपासून धान्य पुरवठा बंद आहे. हा त्या ग्राहकांवर एकप्रकारे अन्याय आहे.
गावागावात राशन दुकानाच्या माध्यमातून होणारा धान्य तथा रॉकेलचा पुरवठा आणि प्रत्यक्ष त्याचा लाभ किती ग्राहकांना मिळाला यासंबंधी राशनकार्डाची तपासणी केल्यास सगळा घोळ उघडकीस येवू शकतो, असाही उल्लेख निवेदनात करण्यात आला. अनेकदा दुकानदार या महिन्याला माल मिळाला नाही, कमी मिळाला, असे सांगून ग्रामस्थांना परतवून लावतात किंवा त्यांना थोडाफार वस्तू देतात. ग्राहकांना शासन नियमानुसार आजही धान्याचे वाटप होत नसून दुकान महिन्यातून दोन-तीन दिवसच उघडल्या जाते.
झडशी, कोटंबा, येळाकेळी, मोही ब्राहणी येथील दुकानाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. स्वस्त धान्य दुकानदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने मनोबल वाढले आहे. या सर्व बाबींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या घोटाळ्याची चौकशी करावी. त्रिसदस्यीय समिती नेमण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करुन माहवारी निकषाप्रमाणे धान्य वाटपे करावे, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Neglect in cheap grains shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.