आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकाराची गरज
By Admin | Updated: January 3, 2015 23:08 IST2015-01-03T23:08:14+5:302015-01-03T23:08:14+5:30
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून गाव पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींसह गावातील प्रमुख व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा विचार व्हावा. तसेच सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा,

आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकाराची गरज
एन. नवीन सोना : आत्महत्या प्रकरणासंदर्भात बैठक; १८ पैकी ११ प्रकरणे पात्र, दोन अपात्र
वर्धा : शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून गाव पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींसह गावातील प्रमुख व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा विचार व्हावा. तसेच सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढेल, आत्मविश्वास निर्माण होईल. अशा कार्यशाळा आयोजित कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्या प्रकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वांना सूचना देताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, पंचायत समिती सभापती मंजु दुधबडे, शेतकरी सदस्य अनिल मेघे, डॉ. नंदकिशोर तोटे, केम प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक संजय सोनटक्के, वैद्यकीय अधिकारी नितीन निमोदिया, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप डोंगरे आदी उपस्थित होते.
समितीसमोर एकूण १८ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे समोर आली. त्यामध्ये ११ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. सेलू तालुक्यातील चाणकी येथील आशिष पाटील, रिधोऱ्यातील गजानन भलावी, वडगाव(खुर्द) येथील कवडू तितरे, आर्वी तालुक्यातील बोरगावचे वासुदेव कौरती, वाढोणा येथील रुपाली कामडी, सोरट्यातील छबु चवरे, हिंगणघाट तालुक्यातील डोरला येथील सचिन हिवरे, काचनगाव येथील राष्ट्रपाल ढोरे, देवळी(दिघी) येथील श्रावण वानखडे, वर्धा तालुक्यातील कुरझडी(फो) येथील नितीन कठाणे, वडद येथील ज्ञानेश्वर इंगोले या मृतकांची प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. आर्वी तालुक्यातील पाचोडच्या रेणुका राठोड आणि वर्धा तालुक्यातील मांडवा येथील राजू मडावी या मृतकांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. तसेच कारंजा तालुक्यातील डायगव्हाण येथील दिवाकर कामडी, आष्टी तालुक्यातील साहूर येथील नीलेश वरकड या मृतकांच्या प्रकरणांची फेरचौकशी करावी, असे समितीने ठरविले.
शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी लागणारे दस्तऐवज संबंधित विभागांनी प्राधान्यानी द्यावेत, तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबाना शासनाची तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. बैठकीमध्ये आमदार डॉ. भोयर, आ. कुणावार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध कार्यशाळा, शेती मेळावे, कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधीही पुढाकार घेतील, असे सांगितले.
यावेळी शेतकरी सदस्य मेघे, डॉ. तोटे यांनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याबरोबरच शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा निपटारा तत्काळ करण्यासाठी उपाय सुचविले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम यांनी करून आभार मानले. शेतकरी आत्महत्या संदर्भातील अडचणी, प्रकरणे आदींवर यावेळी चर्चा करण्यात आली. इतरही अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)