नाल्यांची साफसफाई व रुंदीकरण करण्याची गरज

By Admin | Updated: June 19, 2016 01:52 IST2016-06-19T01:52:19+5:302016-06-19T01:52:19+5:30

पावसाला सुरूवात होत आहे. मृग नक्षत्रात झालेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली.

The need to clean and widen the drains | नाल्यांची साफसफाई व रुंदीकरण करण्याची गरज

नाल्यांची साफसफाई व रुंदीकरण करण्याची गरज

भाजपाची मागणी : मुख्याधिकारी यांना निवेदन सादर
पुलगाव : पावसाला सुरूवात होत आहे. मृग नक्षत्रात झालेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पुढील धोका ओळखून नाल्यांची स्वच्छता व रुंदीकरण करावे, अशी मागणी भाजपाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
शहरातील नाल्यांची नियमितपणे स्वच्छता होत नाही. गांधी चौक, बरांडा परिसर, हिंगणघाट फैल, दखनी फैल, टिळक नगर आदी भागात साफ सफाई करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात नाल्या तुंबून पाणी साचून राहात असल्याचा प्रकार दरवर्षी पहावयास मिळतो. त्यामुळे डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका असतो.
या सर्व बाबीचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरात स्वच्छता व जनजागृती मोहीम राबवावी, तसेच याबाबत जनजागरण मोहीमही देखील राबविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर न्यायालयालगतच्या नाल्याचे रुंदीकरण करण्याची मागणी भाजपाच्या वतीने पालिका मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांना करण्यात आली. शिष्टमंडळात सचिव नितीन बडगे, श्रवण तिवारी, मानसिंग झांझोटे, अविनाश जायदे, विशाल धोपाडे, झाडे आदींचा सहभाग होता.(तालुका प्रतिनिधी)

नाल्यांच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
रोहणा - गावातील नाल्या कचरा व गाळाने बुजल्या आहेत. त्यांची स्वच्छता करण्याबाबत मागील तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत सदस्य संदीप सुटे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना केल्या. असे असतानाही त्यांच्या सूचनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सुटे यांनी केला आहे.
पावसाच्या आधी गावातील तुंबलेल्या नाल्या साफ करणे अत्यावश्यक आहे. नाल्यांची स्वच्छता न केल्यास पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याचा धोका असतो. ही गंभीर बाब लक्षात घेवून ग्रामपंचायत सदस्य संदीप सुटे यांनी तीन महिन्यांपासून सरपंच व ग्रामसचिव यांना नाल्यांची स्वच्छता करण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक मासिक सभेत ही मागणी लावून धरली. पण ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळा तोंडावर येऊनही एकही गोष्ट कृतीत उतरविली नाही.
पावसाळ्यात नाल्या तुंबून त्यात डासांची पैदास होते. परिणामी आजार पसरण्याचा धोका हा जास्त असतो. ही बाब लक्षात घेऊन आधी स्वच्छता उपक्रम हाती घेणे गरजेचे झाले आहे.
दलीत वस्तीतील नाल्यांचे बांधकामही वर्षभरापासून केलेले नाही. सुचविलेल्या कामाकडे ग्रा.पं. प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत ते रोखून धरत असस्ल्याचा आरोपही सुटे यांनी केला आहे.(वार्ताहर)

Web Title: The need to clean and widen the drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.