थंडीची ‘नव्हाळी’, पारा नऊ अंशावर
By Admin | Updated: December 26, 2015 02:11 IST2015-12-26T02:11:20+5:302015-12-26T02:11:20+5:30
डिसेंबर महिन्याचा उत्तरार्धही संपत आला; पण थंडीचा जोर वाढत नव्हता. यामुळे यंदा गुलाबी थंडीपासून जिल्हावासी वंचितच राहतात की काय, असे वाटू लागले होते;

थंडीची ‘नव्हाळी’, पारा नऊ अंशावर
जिल्ह्यात शीतलहर : शेकोट्या पेटायला सुरुवात
वर्धा : डिसेंबर महिन्याचा उत्तरार्धही संपत आला; पण थंडीचा जोर वाढत नव्हता. यामुळे यंदा गुलाबी थंडीपासून जिल्हावासी वंचितच राहतात की काय, असे वाटू लागले होते; पण गत दोन दिवसांपासून जिल्हा गारठायला सुरूवात झाली आहे. सर्वत्र थंडीची लाट पसरून गुरूवारी रात्री पारा एकदम नऊ अंशांपर्यंत घसरल्याने सर्वांना कापरे भरले.
यंदा जिल्ह्यात विशेष पावसाची नोंद झाली नाही. डिसेंबर महिना संपत आला असतानाही विशेष असा गारठा जाणवत नव्हता. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारतातील चेन्नई परिसरात झालेल्या पावसामुळे सुरू झालेली थंडीची लाट पुन्हा ओसरली होती. यामुळे यंदा थंडी पडणार काय, असाच प्रश्न सर्वांना पडला होता; पण आठ ते दिवसांपासून दिल्ली, कोलकाता, गुजरात आदी राज्यांमध्ये तापमान घसरायला लागले आहे. काहीच दिवसांत महाराष्ट्रातही थंडीची लाट पसरणार, असे सांगितले जात होते. चार दिवसांपूर्वी असलेले ढगाळ वातावरण हटून बुधवारपासून जिल्ह्यात गारठा जाणवायला सुरुवात झाली. शुक्रवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात पारा ९ अंशांपर्यंत खाली उतरला. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असून आणखी काही दिवस गारठा कायम राहणार, असे सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)
गरम कपड्यांच्या खरेदीची लगबग
उनी कपडे घेऊन दरवर्षी तिब्बती शरणार्थी जिल्ह्यात दाखल होतात. यंदा डिसेंबर महिना ओसरेपर्यंत विशेष गारठा न जाणवल्याने त्यांची दुकानेही आतापर्यंत ओस पडली होती. या चार ते पाच दिवसांपासून गारठ्यात वाढ झाल्याने आता-आता दुकाने सजू लागली आहेत. यावर्षी विशेष व्यवसाय होत नसल्याची भावना तिब्बती विक्रेते व्यक्त करीत आहेत.
उशिरा का होईना शेकोट्या पेटल्या
डिसेंबर महिना संपायला आला तरीही विशेष थंडी आतापर्यंत जाणवत नव्हती. यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या अद्याप पेटल्या नव्हत्या; पण आठवडाभरापासून तापमान कमी व्हायला लागल्याने शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.
पिकांच्या वाढीस मदत
गहू, चना आदी रबी हंगामातील प्रमुख पिकांसाठी थंड वातावरण आवश्यक असते. आतापर्यंत गारठा नसल्याने पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; पण थंडी वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
स्वच्छ वातावरणामुळे वाढला गारठा
ढगाळ वातावरण असल्यास तापमानात घट होते. यामुळे मधले काही दिवस गारठ्यात घट झाली होती; पण आता हवेचा दाब वाढून वातावरण स्वच्छ झाल्याने गारठा वाढायला लागला आहे. शिवाय गार वारे वाहत असल्याने थंडीचा तडाखा अधिकच जाणवत आहे.