नटाळा हस्तांतरण; जिल्हा परिषद अनभिज्ञ
By Admin | Updated: February 13, 2015 00:28 IST2015-02-13T00:28:43+5:302015-02-13T00:28:43+5:30
सुकळी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी नटाळा गाव विस्थापित करण्यात आले़ ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करून त्यांना कारला रोडलगत पट्टे देण्यात आले़ ...

नटाळा हस्तांतरण; जिल्हा परिषद अनभिज्ञ
वर्धा : सुकळी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी नटाळा गाव विस्थापित करण्यात आले़ ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करून त्यांना कारला रोडलगत पट्टे देण्यात आले़ मिळालेल्या मोबदल्यात ग्रामस्थांनी आपला निवारा उभारला; पण अद्याप तेथील ग्रामस्थांना मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत़ असे असले तरी लघु पाटबंधारे विभागाने मात्र नटाळा गावाचे परस्पर हस्तांतरण केले़ हा प्रकार १३ आॅक्टोबर २०११ रोजी करण्यात आला़ याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले़ शिवाय मुलभूत सुविधा न देता हस्तांतरण होऊ शकत नसल्याचा निर्वाळा जि़प़ प्रशासनाने दिल्याने लघु पाटबंधारे विभागाची गोची झाली आहे़
नटाळा गावाचे पुनर्वसन करण्यात आले; पण तेथील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत़ पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना चार किमी पायपीट करावी लागत आहे़ नटाळा गावाला पाणी पुरविण्यासाठी कारला येथील विहिरीचा आधार घेण्यात आला, पाण्याची टाकी बांधली, पाईपलाईन टाकली; पण नळाला एक थेंबही पाणी आले नाही़ भूजल सर्वेक्षण यंत्रणेने अहवाल न दिल्याने कारला येथे विहीर खोदली व दोन हातपंप केल्याची माहिती लघु पाटबंधारे विभाग देत आहे़ हे खरे असले तरी अद्यापही नटाळा गावात पाणी पोहोचलेले नाही़ पाण्यासाठी दिलेले सार्वजनिक नळ तुटक्या अवस्थेत आहे़ नागरिकांच्या घरांपर्यंत पाईप पोहोचले; पण पाणी आले नाही़
नटाळा पुनर्वसन वसाहतीमधील रस्त्यांचे खडीकरण २०१० मध्ये करण्यात आले़ तेव्हापासून त्या रस्त्यांचे डांबरीकरण झालेच नाही़ सध्या रस्त्यावर गिट्टीचा खच दिसून येतो़ यामुळे त्या भागातील नागरिकांना आपली वाहने चालविणेही कठीण झाले आहे़ हा प्रकार केवळ एकाच रस्त्याबाबत नाही तर या वसाहतीतील प्रत्येक रस्त्यावर केवळ गिट्टीचाच खच दिसून येतो़ सांडपाण्यासाठी नाल्या केल्यात; पण त्या नाल्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक ठिकाणी नाल्या जमिनीत रूतल्या आहेत़ काही ठिकाणी नाल्या भंगलेल्याही दिसून येतात़ शाळा, समाज मंदिराचे बांधकाम करण्यात आले; पण तारेचे कुंपण करण्यात आलेले नाही़ बांधकाम करारनाम्यात अंतर्भाव नसल्याने कुंपण करण्यात आले नसल्याचे लघु पाटबंधारे विभागाने नमूद केले आहे़ ग्रामस्थांना अद्याप पाणी पुरवठा झालाच नसल्याचा आरोप होत असताना लघु पाटबंधारे विभाग मात्र २०११ पर्यंत पाणी पुरवठा केल्याचे उत्तर देत आहे़ पिपरी ग्रामपंचायतीने विजेचे देयक अदा न केल्याने महावितरणने मिटर काढून नेल्याचेही उत्तरात नमूद केले आहे़ वास्तविक, नटाळा पुनर्वसितांना अद्याप पाणी पुरवठाच झाला नसल्याचे सांगण्यात येते़ शिवाय हस्तांतरण प्रक्रियाच अधांतरी असल्याने पिपरी ग्रा़पं़ प्रशासनानेही याकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही़
परस्पर हस्तांतरण प्रक्रिया करता येत नसताना लघु पाटबंधारे विभागाने हा प्रताप कसा केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ नागरी सुविधा पूर्ण होण्यापूर्वी कुठल्याही पुनर्वसित वसाहतीचे हस्तांतरण करता येत नाही; पण संबंधित विभागाने शासनाच्या नियमांना बगल देत हे सोपस्कार पार पाडले़ यात जिल्हा परिषद प्रशासनालाही अंधारात ठेवण्यात आले़ ही बाब लघु पाटबंधारे विभाग मान्य करीत नसली तरी जि़प़ उपकार्यकारी अधिकारी (ग्रा़पं़) यांनी १३ आॅक्टोबर २०११ रोजी दिलेल्या माहितीमध्ये ते सिद्ध झाले आहे़ यामुळे लघु पाटबंधारे विभागच नटाळा प्रकरणात लपवा-छपवी करीत असल्याचे दिसते़ याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पत्राने फोडले बिंग
लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने १३ आॅक्टोबर २०११ रोजी नटाळाचे हस्तांतरण केल्याचे उत्तरात नमूद करून केवळ ग्रामस्थांचीच नव्हे तर जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाचीही दिशाभूल केली़ माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रज्वल चोरे यांनी माहिती मागितली असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि़प़ वर्धा यांनी दिलेल्या पत्रावरून हे बिंग फुटले़ हे पत्र १ जानेवारी २०१५ रोजी देण्यात आले आहे़ या पत्रात मौजा नटाळा पुनर्वसन पिपरी (मेघे) येथील १८ नागरी सुविधा अद्याप पूर्ण न झाल्याने नटाळा पुनर्वसन वसाहत जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाली नसल्याचे नमूद केले आहे़