प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या
By Admin | Updated: March 27, 2015 01:21 IST2015-03-27T01:21:50+5:302015-03-27T01:21:50+5:30
प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेण्याची धमकी दिल्यावरून मुलीच्या भावंडांनी व परिसरातील काही नागरिकांनी युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार केल्याची घटना बोरगाव (मेघे) परिसरात बुधवारी रात्री घडली.

प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या
वर्धा : प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेण्याची धमकी दिल्यावरून मुलीच्या भावंडांनी व परिसरातील काही नागरिकांनी युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार केल्याची घटना बोरगाव (मेघे) परिसरात बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. मृतकाचे नाव गिरीष लक्ष्मण सावरकर रा. बोरगाव (मेघे) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्यांची नावे दीपक येळणे, वाल्मिक देवढे, नारायण मुरमुरे, मोहन येळणे, असे असून रामदास देशमुख हा फरार आहे. या हत्या प्रकरणात या व्यतिरिक्त आणखी दहा जण असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. ते कोण याचा शोध पोलीस घेत असल्याचे ठाणेदार एम. बुराडे यांनी सांगितले. अटकेत असलेल्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर यात आणखी किती जण होते, याचा खुलासा होणार असल्याचेही ते म्हणाले.
पोलीस सुत्रानुसार, गिरीष सावरकर याचे येळणेच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याने तिला पळवून नेण्याची धमकी त्याने दिली होती. यात झालेल्या वादात गिरीष हा येळणे यांच्या घरावर चाकू घेवून गेला. यात त्याला येळणे व परिसरातील नागरिकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय तो घरावर चाकू घेवून आल्याची तक्रारही येळणे शहर पोलिसात देण्यात आली. यावरून गिरीषविरूद्ध शहर ठाण्यात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला.
दरम्यान मारहाणीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गिरीषला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातून प्रथमोचार करून त्याला सेवाग्राम रुग्णालयात हलविले. सेवाग्राम रुग्णालयात नेताच तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी गिरीषचा भाऊ जगदीश सावरकर याच्या तक्रारीवरून दीपक व मोहन येळणे यांच्यासह परिसरातील वाल्मिक देवढे, नारायण मुरमुरे, रामदास देशमुखसह इतरांवर भादंविच्या १४३, १४७, १४९ व ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)