हत्येप्रकरणी आईला १० वर्षे सश्रम कारावास
By Admin | Updated: October 7, 2015 00:45 IST2015-10-07T00:45:59+5:302015-10-07T00:45:59+5:30
मुलीला जाळून मारल्याप्रकरणी आर्वी येथील शिक्षिका असलेल्या मातेला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

हत्येप्रकरणी आईला १० वर्षे सश्रम कारावास
जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा : आर्वी येथील घटना; मुलीला जाळून मारले
वर्धा : मुलीला जाळून मारल्याप्रकरणी आर्वी येथील शिक्षिका असलेल्या मातेला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या मातेचे नाव शुभांगी दिलीप मल्लेवार रा. आर्वी असे आहे. हा निकाल येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांनी मंगळवारी दिला.
थोडक्यात हकीकत अशी की, व्यवसायाने शिक्षक असलेली शुभांगी दिलीप मल्लेवार (३८) हिने ८ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी ९ वाजता तिची १३ वर्षीय मुलगी प्रीती हिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले. यात तिचा १५ डिसेंबर २०१३ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी शेजारी सुभाष चकोले यांनी दिलेल्या रिपोर्टवरून आर्वी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. प्रकरणांचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकूर यांनी व पोलीस निरीक्षक मनवरे यांनी पूर्ण करून शुभांगी विरूद्ध कलम ३०२ भादंवि अन्वये दोषारोप दाखल केले.
सदर प्रकरण न्यायाधीश संध्या रायकर यांच्याकडे आले. शासनातर्फे अॅड. श्याम दुबे यांनी १२ साक्षदारांची साक्ष नोंदविल्या. आरोपीतर्फे शुभांगीचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याचे दाखविण्याकरिता दोन साक्षदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी शासनातर्फे सादर करण्यात आलेल्या पुराव्यांसमोर आरोपीचे वकील तिचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याचे सिद्ध करू शकले नाही.
यावरून न्या. रायकर यांनी शुभांगी मल्लेवार हिला कलम ३०४ भादंविच्या भाग २ अन्वये १० वर्षे कठोर करावासाची शिक्षा व ५००० रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिने करावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक मुळे आणि अॅड. प्रणाली आगलावे व अॅड. रूची तिवारी यांनी मदत केली.(प्रतिनिधी)
बलात्कारप्रकरणी जन्मठेप
शौचास जात असलेल्या विवाहितेवर बळजबरी करणाऱ्या मंगल ऊर्फ मंगेश हुसेन मेश्राम (२६) वर्ष रा. रामपूर, ता. आर्वी, जि. वर्धा याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर अडकर यांनी मंगळवारी दिला.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, १२ मार्च २०१३ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान पीडिता शौचाकरिता शेतात गेली होती. याचवेळी मंगल मेश्राम याने तिचे तोंड दाबले. आरडाओरड केली असता तिला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या हाताचे हाड मोडले. असे असतानाही मंगल याने तिच्यावर बळजबरी केली. या प्रकरणी पीडिता व तिचा पती या दोघांनी पुलगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर.बी. भगत यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरण न्या. समीर अडकर यांच्या न्यायालयात आले. यावेळी सरकारी अभियोक्ता अनुराधा सबाने यांनी प्रकरण सिद्ध करण्याच्या दृष्टीने एकंदर पाच साक्षदार तपासत युक्तिवाद केला. या प्रकरणात जमादार अशोक फरताडे यांनी साक्षदारांना हजर करण्याची कामगिरी बजावली.