सकाळीच वाढविला गावात, हिंगणघाटात बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:32+5:30
हिंगणघाटसह पीडितेच्या गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात पोहोचले. तेथील परिस्थितीची पाहणी केली. गावातील नागरिकांना पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तोपर्यंत नागपूर येथून पीडितेचे पार्थिव निघायचे होते.

सकाळीच वाढविला गावात, हिंगणघाटात बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पेट्रोल हल्ल्यातील पीडित तरुणीचा नागपूर येथील खासगी रूग्णालयात ६.५५ मिनिटांनी मृत्यू झाल्याची वार्ता कळताच वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने तत्काळ हिंगणघाटसह पीडितेच्या गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात पोहोचले. तेथील परिस्थितीची पाहणी केली. गावातील नागरिकांना पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तोपर्यंत नागपूर येथून पीडितेचे पार्थिव निघायचे होते.
नागपूरवरून पीडितेचे पार्थिव दारोड्याकडे येण्यास निघताच हिंगणघाट व परिसरातील अनेक गावांतील नागरिक गावाकडे जाण्यास निघाले होते. हिंगणघाट शहरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मृतदेह गावात आणणार असल्याची माहिती मिळाल्याने समुद्रपूर, जाम आदी भागातील नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे होते.
त्यानंतर पार्थिव घेऊन रूग्णवाहिका गावात दाखल झाली. तोपर्यंत गावातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने गजबजलेले होते. गावात प्रवेश होताच रूग्णवाहिकेवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती सांभाळली. त्यानंतर पीडितेचे पार्थिव तिच्या घरी नेण्यात आले.
हिंगणघाट पोलिसांनी १०० जणांना केले स्थानबद्ध
हिंगणघाट : पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी येताच संतापाची लाट उसळली. हिंगणघाट शहरात शाळा, महाविद्यालयात मौन श्रद्धांजली वाहून सुटी देण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता १०० नागरिकांना हिंगणघाट पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले शांततेचे आवाहन
च्पीडितेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सकाळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. तसेच राज्यातील लोकांच्या संवेदना पीडितेच्या कुटुंबासोबत आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची नागरिकांची मागणी रास्त आहे. गृहमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबाशी संवाद साधला असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हिंगणघाटमधील आठवडी बाजार परिसरात दिवसभर सामसूम
च्घटनेच्या दिवशीपासूनच हिंगणघाट शहरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. आज पीडितेच्या मृत्यूनंतर त्यात आणखीच भर पडली. त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली होती. महामार्गावरील कलोडे चौक, पिंपळगाव चौक या ठिकाणी पोलीसदल सज्ज होते. शहरातील आठवडी बाजारात दररोज गर्दी असतात. मात्र आज सकाळपासूनच कमालीची शांतता होती. व्यावसायिकांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला. सायंकाळी अंत्यसंस्कारानंतर काही दुकाने उघडण्यात आली होती.