राजभाषा मराठीची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:18 IST2019-06-10T22:17:59+5:302019-06-10T22:18:23+5:30

मराठी महाराष्ट्रात राजभाषा जरी असली तरी या राजभाषेची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक होते आहे, ही अतिशय लाजिरवाणी बाब होय, असे मत साहित्यिक व कवी प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केली.

More in Maharashtra than neglecting the official language | राजभाषा मराठीची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक

राजभाषा मराठीची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक

ठळक मुद्देनवनीत देशमुख : इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा धुडगूस

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मराठी महाराष्ट्रात राजभाषा जरी असली तरी या राजभाषेची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक होते आहे, ही अतिशय लाजिरवाणी बाब होय, असे मत साहित्यिक व कवी प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केली.
आज मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू पाहात आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी महाराष्ट्रात धुडगूस घातला आहे. जेवढे जास्त शुल्क तेवढी चांगली शाळा, असे समीकरण झाले आहे. सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळांचा नूर बघण्यासारखा अन् सामान्य मराठी माणसाला बोटे तोंडात घालायला लावणारा असा आहे.
बाह्यस्वरूप एकदम चकचकीत. आज देखावाञ महत्त्वाचा झाला आहे. या तुलनेत मराठी शाळा कुठेही बसत नाहीत आणि पुढे जायचं असेल तर मराठी शाळेत शिक्षण घेऊन पुढे जाता येणार नाही, ही धास्ती. शाळांमधून ग्रंथालये हद्दपार झाली आहेत. आमचा इतिहास, आमची संस्कृती याचा विचार आणि अभ्यास जाणून घ्यायला वेळ कुठे आहे? मोबाइल, इंटरनेट या तंत्रज्ञानाने माणसाला यंत्रवत बनवले आहे आयुष्य गतिमान झालं आहे. पळापळा, कोण पुढे पळतो, अशी शर्यत सुरू आहे. लहान-लहान मुलंही मोबाईल हाताळतात. आईवडील कौतुकानं सांगतात. मराठी भाषेविषयी मराठी माणूसच उदासीन आहे. ५ हजारांचा मोबाईल मुलांना घेऊन देऊ शकतो; पण शंभर रुपयांचं पुस्तक घेऊन देणार नाही. मराठी साहित्यात एम. ए झालेल्या तरुणाला सहज विचारलं, पानिपत वाचली काय? तो माझ्याकडे बघतच राहिला. काही वेळाने त्यानं विचारलं, काय आहे पानिपत? डिग्रीला महत्त्व आहे. म्हणून डिग्री कशी पदरात पाडून घ्यायची, ही मानसिकता तयार झाली आहे. इंजिनिअर, डॉक्टर, प्रोफेसर, शिक्षक यापैकी किती लोकांना सानेगुरुजी माहीत नाहीत. वि. स. खांडेकर, प्र.के. अत्रे माहीतच नाहीत. त्यांची पुस्तके वाचणे तर दूरच. असा अनुभव अनेकदा येतो. वाचनाची प्रक्रियाच शाळामधून बंद पडली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसतो.
ज्या दिवशी प्रत्येकाच्या हातात पुस्तक दिसू लागेल, ते दिवस विकासाचे असतील. हा विकास असेल व्यक्तिमत्त्वाचा, संस्कृतीच्या विकासाचा, देशाच्या अन् राष्ट्राच्या विकासाचा. मुख्यमंत्र्यांनी मराठी सर्व शाळांसाठी बंधनकारक असेल, असे आपल्या भाषणातून कोल्हापूरला सांगितले आहे. त्यामुळे मराठी भाषेला सोनियाचे दिवस पुन्हा पाहता येतील काय?
शाळांतील ग्रंथालयांचे अनुदान बंद
शाळा, कॉलेजला ग्रं्रथालयात ग्रंथ खरेदीसाठी शासनाकडून अनुदान बंद आहे. परिणामी, ग्रंथपाल, पुस्तके शाळांमध्ये नाही. ज्या समाजाची, देशाची वाचन क्षमता क्षीण होते, त्या समाजात, देशात विकास क्षमता नष्ट होते आणि समाज अधोगतीकडे जातो.

Web Title: More in Maharashtra than neglecting the official language