पिसाळलेल्या श्वानाने तोडले चिमुकलीचे लचके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 05:00 AM2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:13+5:30
तस्मीया शेख आरिफ (९) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. श्वानाच्या हल्ल्यात तब्बल १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहे. अनेक जण श्वानाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. असा प्रकार शहरातील सिद्धार्थनगर परिसरात घडला असून मागील काही दिवसांपासून या परिसरातील नागरिक श्वानांच्या दहशतीत होते. आज सकाळच्या सुमारास पिसाळलेल्या श्वानाने तब्बल २० जणांवर हल्ला करत त्यांना चावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पिसाळलेल्या श्वानाने ९ वर्षीय चिमुकलीवर हल्ला करीत तिचे लचके तोडल्याने ती गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास बोरगाव (मेघे) येथील सिद्धार्थनगर परिसरात घडली. जखमी चिमुकलीला सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तस्मीया शेख आरिफ (९) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. श्वानाच्या हल्ल्यात तब्बल १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहे. अनेक जण श्वानाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. असा प्रकार शहरातील सिद्धार्थनगर परिसरात घडला असून मागील काही दिवसांपासून या परिसरातील नागरिक श्वानांच्या दहशतीत होते. आज सकाळच्या सुमारास पिसाळलेल्या श्वानाने तब्बल २० जणांवर हल्ला करत त्यांना चावा घेतला. यामध्ये तस्मीया आरिफ ही चिमुकली गंभीर जखमी झाली. तस्मीया किराणा दुकानात साहित्य आणण्यास गेली होती. घरी जात असताना तिच्यावर पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केला. तिच्या हाता-पायाचे लचके तोडले. नागरिकांच्या जमावाने तस्मीयाला श्वानाच्या तावडीतून बाहेर काढले. तस्मीयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. इतकेच नव्हेतर याच परिसरातील तब्बल २० जणांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला. पिसाळलेल्या श्वानाला मारण्याकरिता परिसरातील नागरिक सकाळपासूनच त्याच्या मागावर होते. हातात लाठ्या-काठ्या घेऊन संतापलेल्या नागरिकांनी अखेर त्या पिसाळलेल्या श्वानाला मारूनच सुटकेचा श्वास घेतला. जखमी तस्मीयावर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. तीला आणखी काही दिवस रूग्णालयात उपचारार्थ ठेवणार असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काहींना उपचारानंतर सुटी देण्यात आली. नगर पालिकेने याकडे लक्ष देत पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
नगर पालिका सुस्तच
शहरात मागील काही महिन्यांपासून पिसाळलेल्या श्वानांनी उच्छाद घातला असून अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. दररोज ४० च्या वर रूग्ण सामान्य रूग्णालयात उपचाराकरिता येत आहेत. तर काही खासगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. पण, नगरपालिका सुस्त असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी त्यांचे दुर्लक्ष होत आहे. श्वानाच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार कां, असा प्रश्न संतप्त नागरिकांतून विचारल्या जात आहे.
नागरिकांनीच पार पाडला अंत्यविधी
पिसाळलेल्या श्वानाच्या दहशतीत असलेल्या सिद्धार्थनगर येथील रहिवासी काही युवकांनी हातात काठ्या घेत श्वानाला ठार मारत सुटकेचा श्वास घेतला इतकेच नव्हेतर मृत श्वानाला जाळून त्याच्यावर अंत्यविधीचे सोपस्कारही पार पाडले.